मंगलप्रभात लोढा:कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री, महाराष्ट्र राज्य
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या राष्ट्रनिर्माणाच्या ऐतिहासिक प्रक्रियेत महाराष्ट्राचे अमूल्य योगदान असेल यात मला कोणतीही शंका नाही. लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्राचे नेतृत्व असल्यानेच हे शक्य होणार आहे. फडणवीस यांच्या सर्वसमावेशक भूमिकेमुळेच राज्याचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न मूर्त स्वरूपात जनतेला पाहायला मिळणार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव म्हणजे विकासाची दूरदृष्टी आणि समाजकारणाचा ठेवा आहे, असे मी मानतो.
देवेंद्र फडणवीस कसलेले राजकारणी, तर आहेतच त्याचबरोबर तितक्याच आत्मीयतेने जनतेच्या सेवेसाठी प्रशासनावर जबरदस्त पकड असणारे, सुशासनाचा आदर्श घालून देणारे, जनतेला लोकाभिमुख सेवा देणारे मुख्यमंत्री आहेत. कणखर बाण्याच्या या दृढनिश्चयी व्यक्तिमत्त्वाचा २२ जुलै रोजी जन्मदिन असून त्यांना माझ्या मनःपूर्वक लाख शुभेच्छा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक व्हिजनरी नेतृत्व आहे. राज्यकारभारात अत्यंत जटिल प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा आहे. सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात विविध विभागाच्या कामगिरीचा आढावा त्यांनी घेतला. यात प्रशासकीय मूल्यमापन करण्याचा धाडसी निर्णयही त्यांनी घेतला.
विभागांना जाहीररीत्या मूल्यांकन त्यांनी दिले. यानिमित्ताने सरकारच्या कारभाराची जनतेत चर्चा होईल, याची जराही भीती फडणवीस यांनी बाळगली नाही. केवळ सकारात्मक परिणाम साधण्यासाठी तसेच तत्परतेने प्रशासकीय काम करण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत त्यांनी हा नवा पायंडा त्यांनी घालून दिला. जनतेच्या हितासाठी धाडसी निर्णय घेणे हा फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू यातून स्पष्ट होतो.
माझ्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता या विभागावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. केवळ शहरी भागातच नाही. तर ग्रामीण तरुणांनाही स्टार्टअप्सच्या माध्यमाने उज्ज्वल भविष्य देण्याचा त्यांचा मानस आहे. महाराष्ट्रभरातील स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या होतकरू तरुणांसाठी एकात्मिक सुविधा केंद्र सुरू केले जाणार आहे. देशातील सर्वाधिक २८ हजार स्टार्टअप्स एकट्या महाराष्ट्रात आहेत. यामध्येही महिला स्टार्टअप्सची संख्या देशात अग्रेसर आहे. राज्यात २० आय.टी. आयमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.
देशातील पहिली इनोव्हेटिव्ह सिटी महाराष्ट्रात उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गिफ्ट सिटीच्या धरतीवर नवी मुंबई येथे ५०० कोटी खर्च करून २५० एकरमध्ये अत्याधुनिक हाय टेक सुविधायुक्त सिटी निर्माण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिंगापूर येथील आयटीई एज्युकेशन सर्व्हिस या संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्रात जागतिक कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याची योजना कौशल्य विभागाने आखली आहे.
जागतिक दर्जाचा कौशल्य विकास साधत महाराष्ट्रातील तरुणांना जागतिक रोजगाराच्या संधी या योजनेमुळे उपलब्ध होणार आहेत. यातही मुख्यमंत्री फडणवीस यांचे सहकार्य लाभत असून लवकरच अत्याधुनिक ट्रेडसह हे जागतिक कौशल्य विकास केंद्र उभे राहील, याची मी निसंकोचपणे ग्वाही देतो. कौशल्य विकास विभागाकडून महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येत असून सुरूअसलेल्या या योजनेत सद्यस्थितीत १ लाख ५० हजार विद्यार्थी कार्य प्रशिक्षण घेत आहेत. कौशल्य विभागाच्या या महत्त्वपूर्ण योजनेत मुख्यमंत्र्यांचे अमूल्य योगदान आहे. आतापर्यंत या योजनेवर ४८१ कोटी इतके रुपये खर्च झाले आहेत.
केवळ एका विभागापुरतेच नाही तर, राज्यातल्या प्रत्येक विभागातल्या विविध योजनांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस स्वतः लक्ष घालून योजना सुसूत्रपणे जनतेपर्यंत कशी पोहोचेल याची काळजी घेतात. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांतर्गत माहे डिसेंबर, २०२४ ते मे, २०२५ या कालावधीमध्ये विविध योजनांद्वारे एकूण १,३४,३०३ उमेदवारांना रोजगार प्राप्त झालेला आहे.
कौशल्य विभागाच्या अंतर्गत राज्यात २०३ रोजगार मेळावे संपन्न झालेले असून यामध्ये २४९२ उदयोजकाद्वारे १,२०,५७२ रिक्तपदे अधिसूचित करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात या विभागाचे काम सुसूत्रपणे अविरत सुरू आहे. पंखांना बळ देण्याची त्यांची भूमिका राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल यात मला तसूभरही शंका नाही. मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय पातळीवरही विविध योजनांचा पाठपुरावा करून कौशल्य विभागाला अधिक सक्षम करत आहेत.
केंद्र शासनाच्या रोजगार व प्रशिक्षण महानिदेशालय तसेच श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत “राष्ट्रीय करिअर सेवा” ही योजना मंजूर करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रही कौशल्य विकासाच्या माध्यमाने या संकल्पात आपले योगदान देत आहे.
विविध रोजगार मेळावे, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र तसेच आयटीआय, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, राज्य नावीन्यता सोसायटी, कौशल्य विकास आयुक्तालय यांच्यामार्फत यांसह विविध रोजगाराच्या योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत सुरू करण्यात आल्या. या योजनांमुळे युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून हा फार मोठा सामाजिक बदल दिसून येत आहे. जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण तरुणांना देशातच नाही तर विदेशातही रोजगाराच्या संधी मिळवून देत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यकारभार करण्यात जसे पारंगत आहेत. तसेच त्यांची पक्षावरही निष्ठा आहे. पक्षाची ध्येयधोरणं राबवण्यात ते मागे राहत नाहीत. मोठ्या पदावर असूनही आपल्यातला कार्यकर्ता त्यांनी जिवंत ठेवलाय. अनेकदा राजकीय स्थित्यंतरे हा राजकारणाचा अविभाज्य भाग असतो. अशाच एका स्थित्यंतरातून ३० जून २०२२ मध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
मुख्यमंत्रीपदाचा सलग पाच वर्षांचा दीर्घ अनुभव, सर्वाधिक आमदारांचे पाठबळ आणि सक्षम नेतृत्वगुण अंगी असतानाही त्यांनी पक्षाचा आदेश पाळत, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पक्षाच्या अनुशासनाची प्रचिती साऱ्या जगाला करून दिली. व्यक्ती मोठी नाही तर पक्ष मोठा, हा संस्कार त्यांनी आपल्या कृतीतून कार्यकर्त्यांवर केला, असे अनुशासित मुख्यमंत्री सर्वसमावेशक नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आहे. महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेणाऱ्या या कर्तृत्वान, दूरदृष्टीच्या नेत्याला आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो, ही त्यांच्या जन्मदिनी सदिच्छा व्यक्त करतो.