नवी दिल्ली : भारताने मलेरिया प्रतिबंधक लस विकसित केली आहे. या लसचे नाव एडफाल्सीवॅक्स असे ठेवण्यात आले आहे. ही लस मलेरियाला प्रतिबंध करेल आणि मलेरियाच्या प्रार्दुभावाला आळा घालण्यासही मदत करेल. यामुळे भारतातून लवकरच मलेरिया या आजाराने उच्चाटन करणे शक्य होईल, असा विश्वास संशोधक व्यक्त करत आहेत.
आयसीएमआरने मलेरिया प्रतिबंधक लस विकसित केल्याचे जाहीर केले आहे. डासांमुळे भारतात दरवर्षी अनेकजण आजारी पडतात. यातील काही जणांचा मृत्यू होतो. पण मलेरियाला प्रतिबंधक लसमुळे ही परिस्थिती बदलण्यास मदत होणार आहे. भारतात डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांना प्रतिबंध करण्यासाठीही लस विकसित करण्याचे काम सुरू आहे.
भारताने विकसित केलेली मलेरिया प्रतिबंधक लस अर्थात एडफाल्सीवॅक्स परजीवी प्लास्मोडियम फाल्सीपेरमवर कमालीची प्रभावी ठरली आहे. लस घेतलेल्या व्यक्तीच्या शरीरात मलेरियाशी संबंधित परजीवी सक्रीय होऊ शकत नाही. यामुळे संबंधित व्यक्तीला मलेरिया होत नाही तसेच त्याच्या शरीरातून मलेरियाचे कोणत्याही प्रकारे संक्रमण होण्याची शक्यता मावळते.
मलेरिया प्रतिबंधक लसची प्रगती कोणत्या टप्प्यावर ?
भारताच्या मलेरिया प्रतिबंधक लसने प्री क्लीनिकल व्हॅलिडेशन हा टप्पा पूर्ण केला आहे. लवकरच ही लस वाजवी दरात बाजारात उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे. भारत निवडक देशांना ही लस परवडणाऱ्या दरात उपलब्ध करुन देणार आहे. लस देऊन भारत जगाभरातून मलेरियाचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.