
मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत ९० टक्के मतदारांचा सहभाग
पाटणा : बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत राज्यातील ९०.१२ टक्के मतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. यामध्ये ३६.८६ लाख मतदार गहाळ, मृत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित असल्याचेही आढळले आहे.
या विशेष पुनरीक्षणाची सुरुवात २५ जून रोजी झाली होती. आयोगाने २४ जून रोजी आदेश जारी केल्यानंतर लगेचच बिहारमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली. राज्यातील ७.८ कोटी नोंदणीकृत मतदारांना मतदार यादीत नावाची पुष्टी करण्यासाठी फॉर्म भरून देण्याचे आवाहन करण्यात आले होते.
आयोगाच्या माहितीनुसार, ७.११ कोटी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६.८५ कोटी अर्ज डिजिटल स्वरूपात प्रक्रियेत आणण्यात आले आहेत. ६९७८ मतदार (०.०१ टक्के) ‘शोधता न येणारे’ असल्याचेही नोंदवले गेले आहे.
गहाळ, मृत, कायमस्वरूपी स्थलांतरितांबाबत आयोगाचा खुलासा
पुढील टप्पा - मसुदा यादी व हरकती १ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान मसुदा यादीवर हरकती व दावे सादर करता येतील. निवडणूक नोंदणी अधिकारी २५ सप्टेंबरपर्यंत या हरकतींचा निपटारा करतील. ३० सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल.
२५ जुलैपूर्वी हरकती नोंदविण्याचे आवाहन बीएलओ यांनी सांगितले की, ते २५ जुलैच्या काही दिवस आधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, हरकती अथवा दावे २५ जुलैपूर्वी नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
राजकीय पक्षांना यादी मोफत प्रिंट व डिजिटल स्वरूपात अंतिम मतदार यादी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मोफत दिली जाणार असून, ती निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरही उपलब्ध असेल.