मुंबई ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’चे जागतिक केंद्र होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईत ‘आयआयसीटी’ चा शुभारंभ; क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवे पर्व – केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव


मुंबई: मुंबई ही देशाची ‘एंटरटेनमेंट कॅपिटल’ आहे आणि याच शहरातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’साठी जागतिक पातळीवर पुढाकार घेण्याची घोषणा केली होती. ती घोषणा आज यशस्वीरित्या प्रत्यक्षात उतरली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


मुंबई येथे १ ते ४ मे २०२५ दरम्यान वेव्हज् परिषदेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या वेव्हज परिषदेच्या निष्कर्ष अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. त्याचप्रमाणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) आणि एनएफडीसी कॅम्पसचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण, माहिती तंत्रज्ञान तसेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, केंद्रीय सचिव संजय जाजू तसेच प्रसून जोशी, साकेत मिश्रा, शेखर कपूर आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या वेव्हज् (WAVES) या भव्य आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराचे कौतुक करत, मुंबई केवळ या कार्यक्रमाचे यजमान शहर नव्हते, तर ही एक चळवळ बनली असल्याचे सांगितले. क्रिएटिव्ह इकॉनॉमीशी संबंधित वेव्हज् इंडेक्सचे महत्त्व सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, या इंडेक्सची किंमत काही महिन्यांपूर्वी ९३,००० कोटी होती. आता ती १ लाख कोटींवर पोहोचली आहे. यावरून या क्षेत्राची झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात येते. क्रिएटर्स इकॉनॉमीच्या पुढील टप्प्याला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ₹१५० कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वेव्हज् परिषद आता दरवर्षी किंवा दोन वर्षांनी मुंबईतच होईल. पुढील कार्यक्रम हा याहून भव्य असेल, याची हमी देत असल्याचेही त्यांनी सांगितले.


आयआयसीटी (IICT – Indian Institute of Creative Technologies) या संस्थेबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आयआयसीटी केवळ प्रशिक्षण संस्था नसून एक ‘आयकॉनिक डेस्टिनेशन’ ठरेल. लोक इथे शिकण्यासाठीच नव्हे, तर पाहण्यासाठीही येतील. ही संस्था पुढील पिढ्यांसाठी क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा केंद्रबिंदू बनेल. तसेच, त्यांनी ‘वेव्हज्’ कार्यक्रमादरम्यान तयार करण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियनचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, ही आपल्या सृजनात्मकतेच्या इतिहासाची एक सुंदर झलक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार हे पॅव्हेलियन आता गुलशन बिल्डिंगमध्ये कायमस्वरूपी स्थापन करण्यात आले आहे. यामुळे मुंबईतील पर्यटनस्थळांत एक नवे आकर्षण स्थळ जोडले गेले आहे.



मुंबईत ‘आयआयसीटी’ चा शुभारंभ; क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवे पर्व – केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव


केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नॉलॉजी (IICT) च्या पहिल्या कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले, ही केवळ सुरुवात असून, क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसाठी आयआयटी-आयआयएम प्रमाणे एक संपूर्ण शैक्षणिक साखळी उभी करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी कल्पना आहे.


देशातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण करणारा हा उपक्रम आहे. क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये काम करणाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, कौशल्ये आणि जागतिक दर्जाची साधने देण्याचा हेतू या संस्थेमागे आहे. ‘आयआयसीटी’च्या स्थापनेसाठी आतापर्यंत  कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, मुंबई फिल्म सिटीमध्ये पुढील मोठा कॅम्पस उभारला जाणार आहे. त्याची रचना पर्यावरण व भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊनच ‘आयआयसीटी’ची इमारत तयार करण्यात येणार आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.


वैष्णव म्हणाले की, या ‘आयआयसीटी’मध्ये गुगल, मेटा, एनव्हिडिया, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, ॲडोबी, यांसारख्या जागतिक कंपन्यांसोबत औपचारिक भागीदारी झाली असून, न्यू यॉर्क विद्यापीठासोबतही करार झाल्याचे त्यांनी सांगितले. हे अभ्यासक्रम उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आखण्यात आले आहेत. यात व्हीएफएक्स, गेमिंग, एक्सआर, पोस्ट-प्रॉडक्शन, अ‍ॅनिमेशनसारख्या क्षेत्रांमध्ये प्रगत प्रशिक्षण देण्यात येईल. प्रथम वर्षी ३०० विद्यार्थी व प्रशिक्षकांना पूर्ण प्रशिक्षण देणे हे लक्ष्य ठेवण्यात आले असून, ३ महिन्यांपासून ते २ वर्षांपर्यंतचे विविध कालावधीचे अभ्यासक्रम असतील, असे त्यांनी सांगितले.


मुंबई ही देशाची क्रिएटिव्ह कॅपिटल आहे, आणि अशा शहरात भारतातील पहिले आयआयसीटी कॅम्पस उभारले जात आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे, असे गौरवोद्गार काढत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष आभार मानले. फिल्म सिटीमध्येही जमीन तात्काळ उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.


यावेळी प्रसार भारती आणि महाराष्ट्र फिल्म ॲण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यामध्‍ये माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात नाविन्यता, कौशल्यस्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी सामंजस्य करार झाला. त्याबरोबर, ‘आयआयसीटी’च्या लोगोचे अनावरण करण्यात आले. केंद्रीय सचिव संजय जाजू यांनी मुंबईत झालेल्या वेव्हज् परिषदेच्या निष्कर्षाची माहिती दिली.

Comments
Add Comment

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी