किकवी धरणाच्या भूसंपादनाचे दर निश्चित; प्रकल्पाला मिळणार चालना
नाशिक:मागील वर्षी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळालेल्या किकवी धरणाच्या भूसंपादनासाठी दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. धरण पुर्णत्वास आल्यानंतर त्र्यंबकेश्वरसह नाशिक महापालिका क्षेत्राचा पाण्याचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.
किकवी धरणाच्या भूसंपादन प्रक्रियेस गती देण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठर पार पडली. यामध्ये दर निश्चित करण्यात आले. या प्रकल्पासा अधिग्रहीत करण्यात आलेल्या जमिनींचे गुणाकार पद्धतीने मूल्यांकन करण्यात येणार आहे.
तसेच शासनातर्फे बाधित शेतकऱ्यांना २५ टक्के अतिरिक्त अनुदान देण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करूनच भूसंपादन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, आक्टोंबर २०२४ मध्ये झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हे धरण पुर्ण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तत्पुर्वी या प्रकल्पासाठी आवश्यक १७२.४६८ हेक्टर पर्यायी वनजमीन दि.२८ डिसेंबर २०१० अन्वये वनविभागाकडून वर्ग करण्यात आली. तत्कालीन पर्यावरण आणि वन विभागच्या केद्रींय मंत्री जयंती नटराजन यांच्या मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली होती.
तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १० गावातील ७३४.५४२ हेक्टर खाजगी जमिनींची संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात आली. त्यानुसार तळवाडे, ब्राह्मणवाडे, पिंपरी, पिंपळद, तळेगाव, आंबोली, शिरसगाव, काचुर्ली आणि सापगाव या दहा गावांना गेल्या वर्षी भूसंपादनाच्या नोटिसा बदलण्यात आल्या होत्या.
प्रस्तावाच्या सुधारित मान्यतेनुसार भूसंपादनासाठी ६५२ कोटींची आवश्यकता आहे.
गंगापूर धरणाचा भार हलका होणार
२००२ साली मेरीच्या अहवालानुसार गंगापूर धरणाच्या जिवंत साठ्यातून ४३.७४९ दलघमी साठा कमी झाला आहे. हा साठा पुनर्स्थापित करण्यासाठी या धरणाच्या उर्ध्व बाजूस किकवी नदीवर ७०.३६ दलघमी क्षमतेचे किकवी धरण उभारले जाणार आहे. किकवी प्रकल्पाच्या योजनेसाठी २६ ऑगस्ट, २००९ मध्ये २८३.५४ कोटी खर्चाला शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. यामध्ये ६०.०२ दलघमी उपयुक्त जलसाठा निर्माण होणार असून, पिण्याच्या पाण्यासाठी गंगापूर धरणावरील भार हलका होण्यास मदत होणार आहे.
प्रकल्पावर १.५० मेगा वॅट वीजनिर्मिती होणार
त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यातून गोदावरी नदी प्रवाहित होत असल्याने पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागात पुर नियंत्रण करणे शक्य होईल. तसेच या प्रकल्पावर १.५० मेगा वॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. परिणामी विजेचे भारनियमन कमी होण्यास मदत होईल. धरणाच्या बुडीत क्षेत्रास लागून असलेल्या वन क्षेत्राचा आणि वन्य प्राण्यांचा विकास करण्यात येणार आहे. आदिवासी क्षेत्रात सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.