कोकण आयकॉन : सतीश पाटणकर
रामकृष्णबुवांचा जन्म २८ नोव्हेंबर, इ. स. १८७४ रोजी गोव्याच्या सीमेनजीक महाराष्ट्रात आताच्या दोडामार्ग तालुक्यातील वझरे या गावी झाला. हे गाव तेव्हाच्या सावंतवाडी संस्थानात होते. दहा महिन्यांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आईने मोलमजुरी करून मुलाचे पालनपोषण केले. रामकृष्णबुवांना लहानपणापासून गायक होण्याचाच ध्यास होता. आईनेही मुलाला गायकीचे शिक्षण देण्यासाठी काबाडकष्ट घेतले. लहान वयातच बुवांचा संगीताकडील ओढा स्पष्ट झाल्यावर त्यांनी संस्थानातील राजगायकांकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे दोन वर्षे गाणे शिकल्यावर ते मालवण येथे पुढील संगीत शिक्षणासाठी गेले. संगीत शिकणे हे एकच ध्येय घेऊन वयाच्या बाराव्या वर्षी बुवांनी घर सोडले.
घर सोडल्यानंतर रामकृष्णबुवा आधी पुण्याला गेले. तेथून संगीत शिक्षणासाठी मुंबई, इंदूर, उज्जैन, वाराणसी असा त्यांचा प्रवास चालू राहिला. ग्वाल्हेर येथे उस्ताद निसार हुसेन खाँ यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीला खरे वळण मिळाले. त्यांनी काही काळ जयपूर येथे मनरंग परंपरेतील मुहम्मद अली खान यांच्याकडूनही शिक्षण घेतले. जयपूर येथे त्यांची गाठ पुन्हा निसार हुसेन खाँ यांच्याशी पडली. या खेपेस खाँसाहेबांनी वझेबुवांना कसून तालीम दिली. वाराणसी येथे त्यांना स्वामी विवेकानंदांच्या सहवासात १५ दिवस राहण्याची संधी मिळाली. नेपाळमध्ये दरबार गायक म्हणून त्यांनी वर्षभर सेवा केली.
त्यानंतर मायदेशी परतण्याच्या ओढीने ते आपल्या मूळ प्रदेशात आले. गायक-नट कै. केशवराव भोसले यांच्या आग्रहावरून बुवांनी ललितकलादर्श या कंपनीच्या नाटकांना चाली दिल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित रणदुंदुभी आणि सन्यस्त खड्ग या संगीत नाटकातली पदे वझेबुवांनी स्वरबद्ध केली होती.
वधुपरीक्षा, संन्यासाचा संसार, शहा शिवाजी, श्री, रणदुंदुभी, नेकजात मराठा, सोन्याचा कळस अशा अनेक नाटकांतील त्यांनी संगीत दिलेली पदे लोकांच्या विशेष पसंतीस उतरली. त्यांनी देशभर भ्रमंती करून अनेक मैफली गाजविल्या. त्यांनी तयार केलेल्या गायकीचा ‘वझेबुवांची गायकी’ म्हणून खास गौरव झाला. दुर्मीळ संगीत रागांमधील दुर्मीळ चिजांचे त्यांनी संकलन केले होते, ते ‘संगीत कला प्रकाश’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाले. गायनावर निस्सीम प्रेम केलेल्या या थोर गायकाने गाणे हे श्रोत्यांसाठी आहे असे सतत मानले. गोव्यात फोंडा तालुक्यात नागेशी येथे त्यांनी १८ वर्षे मुक्काम केला.
बेळगावला काही वर्षे वास्तव्य केल्यानंतर अखेर ते पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी संगीत विद्यालय चालविले. ५ मे, इ. स. १९४५ रोजी बुवांचे निधन झाले. गोव्यात तसेच महाराष्ट्रात दीनानाथ मंगेशकर, केसरबाई केरकर, व्ही. ए. कागलकरबुवा, तानीबाई, केशवराव भोसले, भास्करराव जोशी, बापूराव पेंढारकर, भार्गवराम आचरेकर, हरिभाऊ घांग्रेकर, भालचंद्र पेंढारकर, गुरुराव देशपांडे, दिनकरपंत फाटक, गजाननबुवा जोशी, शिवरामबुवा वझे, लक्ष्मणराव वझे, मोहनबुवा कर्वे, विनायकराव पटवर्धन अशा पुढे नावारूपाला आलेल्या कलाकारांना रामकृष्णबुवांनी गायनाचे शिक्षण दिले.
बुवांचे शिष्य, पं. भास्करबुवा जोशी यांच्याकडून आपले गुरू रामकृष्णबुवा वझे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मिळालेल्या देणगीतून दरवर्षी गंधर्व महाविद्यालय, पुणे यांच्यातर्फे इ. स. १९९५ पासून प्रतिभावंत गायक/गायिकांना ‘रामकृष्णबुवा वझे पुरस्कार’ देण्यात येतो. रामकृष्णबुवांना लहानपणापासून गायक होण्याचाच ध्यास होता. त्यांच्या आईनेही मुलाला गायकीचे शिक्षण देण्यासाठी काबाडकष्ट घेतले. लहान वयातच बुवांचा संगीताकडील ओढा स्पष्ट झाल्यावर त्यांनी संस्थानातील राजगायकांकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे दोन वर्षे गाणे शिकल्यावर ते मालवण येथे पुढील संगीत शिक्षणासाठी गेले. घर सोडल्यानंतर रामकृष्णबुवा आधी पुण्याला गेले. तेथून संगीत शिक्षणासाठी मुंबई, इंदूर, उज्जैन, वाराणसी असा त्यांचा प्रवास चालू राहिला.
सांगीतिक क्षेत्रात भास्करबुवा बखले आणि रामकृष्णबुवा वझे या दोघांनी दोन वेगवेगळ्या शैली निर्माण केल्या. त्या त्या शैलीत त्यांनी त्यांचे शिष्य घडवले. बुद्धीपेक्षा भावनेला आवाहन करणारी बालगंधर्वांची लडीवाळ गायकी, ज्याचे शिल्पकार होते भास्करबुवा बखले, तर दुसरीकडे भावनेपेक्षा बुद्धीला आवाहन करणारी तडफदार, लयप्रधान
गायकी, जिचे शिल्पकार वझेबुवांच्या रचनांचे पहिले गायक केशवराव भोसले हे होते.
अशा या थोर गायनाचार्यांचे त्यांच्या जन्म गावी स्मारक व्हावे यासाठी मी आणि माझे गोव्यातील सहकारी रामदास केळकर, वझे यांनी पुढाकार घेतला. त्यांचे एक स्मारक उभारण्यात आले. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ गायक व वझे बुवांचे शिष्य भालचंद्र पेंढारकर यांनी केले. यावेळी गायक, कलाकार प्रसाद सावकारही उपस्थित होते.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)