कांदा-टोमॅटोतील तोट्यानंतर शेतकऱ्यांचा कोबीकडे मोर्चा

कळवणमध्ये कोबी लागवडीत मोठी वाढ


कळवण : यावर्षी कांदा आणि टोमॅटो पिकांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोबी लागवडीचा पर्याय निवडला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तींनी पिकांचे नुकसान केल्याने शेतीत होणारा तोटा भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कोबीला पसंती दिली असून, यंदा तालुक्यात अंदाजे ४०० ते ५०० एकर क्षेत्रावर कोबीची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ४० ते ६० एकराने वाढले आहे.


नैसर्गिक आपत्त्यांनी पिकांचे नुकसान:


गेल्या वर्षभरापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अपवाद वगळता, मागील वर्षी सर्वच महिन्यांत पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. अति पावसामुळे कांदा लागवड उशिरा झाली, परिणामी अपेक्षित उत्पादन मिळाले नाही.
मे महिन्यातील उष्णता आणि अवकाळी पावसाने उरलेले पीकही खराब झाले. मिरचीलाही पाऊस आणि कमी बाजारभावाने फटका बसला. यानंतर टोमॅटोमधून काहीतरी मिळेल अशी अपेक्षा होती, पण सततच्या पावसामुळे त्यावरही पाणी फेरले गेले.


कोबी पिकाची निवड:


या सर्व परिस्थितीत कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कोबी पिकाकडे मोर्चा वळवला आहे. सध्याच्या पावसाळी वातावरणाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोबीची लागवड करण्यात आली आहे. जर असेच अनुकूल वातावरण राहिले, तर शेतकऱ्यांना इतर पिकांमधील नुकसान भरून काढता येईल अशी आशा आहे. गुजरात, मुंबई, मालेगाव, जळगाव आणि नाशिक येथे कोबीसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणचे बहुतांश व्यापारी थेट बांधावर माल खरेदी करण्यासाठी येत असल्याने शेतकऱ्यांचा पीक काढण्याचा आणि विकण्याचा त्रास खूप कमी होतो.


मेहनतीचे पण शाश्वत पीक:


भगवान पाटील, दह्याणे (बर्डे) येथील कोबी उत्पादक शेतकरी सांगतात, "इतर पिकांच्या तुलनेत कोबी पिकामुळे तोटा होण्याचे प्रमाण खूप कमी आहे.
हे पीक कमी दिवसांत येत असले तरी त्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि पोटाच्या मुलांप्रमाणे जपावे लागते. सध्याच्या घडीला इतर पिकांनी निराशा केल्यामुळे कोबी पिकाकडून खूप अपेक्षा आहेत. यामुळे तालुक्यात कोबी लागवड मोठ्या प्रमाणात दिसत आहे."


उत्पादनाचा खर्च आणि उत्पन्न:


साधारणपणे ४५ ते ६० दिवसांचे पीक असलेल्या कोबीच्या लागवडीपासून काढणीपर्यंत एकरी ७० हजार ते १ लाख रुपये खर्च येतो. एका एकरमध्ये २० टन कोबीचे उत्पादन मिळते. जर बाजारभाव १५ ते २५ रुपये प्रति किलो मिळाला, तर एकरी ३ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. यामुळे या पिकाला शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जात आहे.


बियाणे विक्रीत वाढ:


कळवणमधील सप्तशृंगी ॲग्रोचे संचालक सुधाकर खैरनार यांनी सांगितले की, "कळवण तालुक्यात व आसपासच्या भागात अंदाजे ८०० ते १००० किलो कोबी बियाण्याची विक्री झाली आहे. काही शेतकऱ्यांनी नर्सरीमधून तयार रोपेही घेतली आहेत. यावर्षी 'युरो २', 'वीर ३३३ डॉलर' या कोबीच्या वाणांबरोबरच इतर वाणांनाही शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होती."

Comments
Add Comment

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

नाशिकमध्ये कर्मभूमी एक्स्प्रेसमधून तिघे खाली पडले, दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

नाशिक : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटलेल्या आणि बिहारच्या रकसोलकडे जात असलेल्या कर्मभूमी

ऐन दिवाळीत 'काळाचा घाला'! नाशिकजवळ कर्मभूमी एक्स्प्रेसमधून पडून २ युवकांचा दुर्दैवी अंत, १ गंभीर

नाशिक: मुंबईत पोटापाण्यासाठी गेलेल्या आणि दिवाळीच्या सणासाठी आपल्या कुटुंबीयांना भेटायला बिहारच्या दिशेने

आत्मनिर्भरतेची ‘तेजस’ भरारी

संरक्षण उत्पादनात १०० टक्के स्वदेशीकरणाचा संकल्प : राजनाथ सिंह नाशिक : भारताच्या संरक्षण क्षेत्रातील

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे भाव घसरले, कांदा उत्पादक हवालदिल

लासलगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले

'UP पॅटर्न'चा धसका! नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या 'बुलडोझर ॲक्शन'ची जोरदार चर्चा

अवैध बांधकामे, गुन्हेगारी अड्डे जमीनदोस्त; "गुन्हेगारांना माफी नाही, कायदा सर्वांसाठी समान" – मुख्यमंत्र्यांचे