सोलापूर : सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार्जरच्या वायरने बायकोची हत्या करत नवऱ्याने देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात घडली. गोपाळ लक्ष्मण गुंड (30) आणि गायत्री गोपाळ गुंड (22) अशी पती पत्नीची नावे आहेत. विशेष म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी गोपाळ आणि गायत्री यांचा प्रेम विवाह झाला होता. या घटनेमुळे सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावातील गोपाळ लक्ष्मण गुंड (30) आणि गायत्री गोपाळ गुंड (22) यांचा दोन महिन्यांपूर्वीच प्रेम विवाह झाला होता. आषाढी एकादशी निमित्ताने त्यांचे कुटुंबीय हे कीर्तनासाठी बाहेर गेले होते. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर कुटुंबियांना गायत्री आणि गोपाळ हे दोघे ही मृतावस्थेत आढळून आले.
पती गोपाळने त्याची पत्नी गायत्री हिचा चार्जिंगच्या वायरने गळा आवळत खून केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गोपाळने असं टोकाचे पाऊल नेमकं का उचललं? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून या घटनेचा तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेमुळे सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.