
पावसामुळे भारताच्या विजयाच्या आशा धूसर होण्याची शक्यता
एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. आज या सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. आज इंग्लंड त्यांच्या दुसऱ्या डावात ३ विकेट्स गमावून ७२ धावांनी पुढे खेळेल. ऑली पोप २४ धावांवर नाबाद आहे आणि हॅरी ब्रूक १५ धावांवर आहे. सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला जिंकण्यासाठी ६०८ धावांचे लक्ष्य दिले आहे.. इंग्लंडला इतका मोठा धावांचा डोंगर एका दिवसांत गाठणे तसे कठीणच आहे. मात्र, ऐनवेळी आलेल्या पावसामुळे भारताच्या विजयांच्या आशा भंग देखील होऊ शकतात. कारण खेळ सुरूच झाला नाही तर हा सामना अनिर्णित घोषित केला जाऊ शकतो. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांच्या नजरा सामना कधी सुरू होणार, यावर आहेत.
सध्या, ताज्या बातमीनुसार एजबॅस्टनमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याचा उर्वरित खेळ वेळेवर सुरू होऊ शकलेला नाही. काल झालेल्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने त्यांचा दुसरा डाव ४२७/६ च्या धावसंख्येवर घोषित केला होता. सामन्यात, भारतीय संघाने त्यांच्या पहिल्या डावात ५८७ आणि इंग्लंडने त्यांच्या पहिल्या डावात ४०७ धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे, भारताला १८० धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, चौथ्या दिवशी इंग्लंडची सुरुवात खराब झाली. त्यांनी ५० धावांत तीन विकेट गमावल्या आहेत. ज्यात जॅक क्रॉलीला मोहम्मद सिराजने शून्यावर बाद केला. तर बेन डकेट (२५) आणि जो रूट (६) यां दोघांना आकाश दीपने धावबाद केले. यानंतर, ऑली पोप आणि हॅरी ब्रूक पिचवर असून, आज इंग्लंडची मदार या दोघांच्या कामगिरीवर असणार आहे.