Saturday, July 5, 2025

संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

कोकणातील ९९ शाळांनाही बसणार फटका


मुंबई : शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका राज्यभरातील अनेक शाळांना बसला असून राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून त्याचा फटका कोकणातील ९९ शाळांनाही बसणार आहे. यावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्वंकष निर्णय घेण्यासाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आमदारांबरोबर तसेच ज्या विभागातील आमदारांच्या शाळांना फटका बसला आहे त्या आमदारांसहित बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिले.


राज्यात संचमान्यतेनुसार जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक आणि मुख्याध्यापकांची पदे निश्चित होतात. त्यानुसार २०२४-२५ या वर्षांच्या संच मान्यतेचे निकष शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना फायदा होण्याऐवजी तोटाच सहन करावा. पुणे विभागातील माध्यमिक शाळेतील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप शालार्थ आयडी मिळालेले नाहीत. अनुदानित माध्यमिक शाळांपैकी ८८४ शाळांना २०२४-२५ च्या संचमान्यतेमध्ये एकही शिक्षकांचे पद मंजूर करण्यात आलेले नाही, असे जयंत आसगावकर यांनी परिषदेच्या निदर्शनाला आणून दिले. चर्चेत ज. मो. अभ्यंकर, भाई जगताप, परिणय फुके, प्रवीण दरेकर, ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह अनेक सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. राज्यात शालांत परीक्षेत कित्येक वर्षे कोकणातील शाळांचा रिझल्ट पहिल्या श्रेणीचा लागत आहे. मात्र संच मान्यतेमुळे कोकणातील शाळांचे आणि मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सुमारे ९९ शाळांना फटका बसला आहे. त्यामुळे संच मान्यतेत दुरुस्ती होणे आवश्यक आहे, अशी माहिती निरंजन डावखरे यांनी दिली. संचमान्यतेत अनेक त्रुटी असून त्या सुधारण्याच्या दृष्टीने जीआरमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. हा राज्यव्यापी प्रश्न असल्याने आपणा सर्वांबरोबर एक बैठक घेऊन त्यात अधिकच्या सुधारणा करण्यात येतील, असे भोयर म्हणाले.

Comments
Add Comment