नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै महिन्यासाठी दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. देशवासीयांना या महिन्यात उष्णतेपासून आराम मिळण्याची शक्यता असून, बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि सामान्यपेक्षा कमी तापमान राहण्याचा अंदाज आहे. मात्र, हा पाऊस सर्वत्र सारखा नसेल, कारण ईशान्य आणि पूर्व भारतासह काही भागांना कमी पावसावरच समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत.
मान्सूनचे आगमन २४ मे रोजी लवकर झाले आणि ४ जूनपर्यंत तो देशाच्या निम्म्या भागात पोहोचला. मात्र, त्यानंतर दोन आठवड्यांचा खंड पडला आणि गेल्या दोन आठवड्यांत कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून महिन्याच्या तुलनेने जुलै २०२५ मध्ये देशभरातील एकूण मासिक पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) १०६ टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. जूनमध्ये देशात सरासरीपेक्षा ९% जास्त पावसाची नोंद झाली. मात्र देशभरात तो आसमानरित्या झालं. ज्यामुळे काही ठिकाणी कमी पाऊस तर काही ठिकाणी अतिरिक्त पावसाची नोंद झाली. पूर्व भारतात (-१६.९%) आणि दक्षिण भारतात (-२.७%) पावसाचे प्रमाण कमी होते, तर वायव्य भारतात (४२.२%) आणि मध्य भारतात (२४.८%) अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. यामागे मान्सूनच्या वितरणातील अनियमितता कारणीभूत होती.
सामान्यतः जुलै महिन्यात देशभरात सुमारे २८० मिमी पावसाची नोंद होते. हा अतिरिक्त पाऊस शेती आणि देशातील जलस्रोतांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. मात्र यावर्षी धोक्याचाही इशारा देण्यात आला आहे.
अतिरिक्त पावसासोबत धोक्याचाही इशारा
भारत हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, "जुलै 2025 मध्ये पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या 106 टक्क्यांहून अधिक असण्याची शक्यता आहे. सामान्यतः जुलै महिन्यात सुमारे 280 मिमी पावसाची नोंद होते. अधिक पाऊस शेती व जलस्रोतांसाठी फायदेशीर ठरेल, मात्र यामुळे पूर, भूस्खलन, वाहतुकीत अडथळे आणि आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या पूर्वसूचनांवर लक्ष ठेवून सतर्क राहावे."
या भागांमध्ये कमी पावसाची शक्यता
देशाच्या बहुतांश भागांत चांगल्या पावसाचा अंदाज असला तरी, ईशान्य भारत, पूर्व भारत, दक्षिण द्वीपकल्पाचा काही भाग आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमानाच्या बाबतीत, देशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र, ज्या भागांत कमी पावसाचा अंदाज आहे, तिथे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकते.