जयपूर: राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर एक अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे मृतदेह ६ ते ७ दिवसांपूर्वीचे असून, त्यांच्याजवळ पाकिस्तानी सिम कार्ड आणि ओळखपत्रे सापडली आहेत. यामुळे तपास यंत्रणांना मानवी तस्करीचा संशय असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
जैसलमेरच्या सादेवाला परिसरात भारत-पाकिस्तान सीमेवरील तारांच्या कुंपणापासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर हे दोन मृतदेह सापडले. पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तनोट पोलिसांनी दोन्ही मृतदेह रामगढच्या सीएचसीमधील शवागारात ठेवले आहेत. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
पाकिस्तानी नागरिक असण्याचा संशय
मृतदेहांजवळ सापडलेल्या ओळखपत्रांनुसार, तरुणाचे नाव रवी कुमार असून तो पाकिस्तानच्या सिंध प्रांताचा रहिवासी आहे. मृत अल्पवयीन मुलीचे नाव शांतीबाई आहे. दोघेही एकाच जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे पाकिस्तानी सिम कार्ड आणि ओळखपत्रे सापडल्याने, सीमा सुरक्षा दल (BSF) आणि जैसलमेर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
तपास यंत्रणांकडून अनेक शक्यतांचा विचार
सध्या पोलीस हे मृतदेह भारतातील रहिवाशांचे आहेत की पाकिस्तानमधील, याचा तपास करत आहेत. मानवी तस्करीची शक्यताही पडताळली जात आहे. तसेच, हे दोघे पाकिस्तानचा व्हिसा घेऊन जैसलमेरमध्ये राहत होते का, किंवा त्यांनी सीमेवरील तारेचे कुंपण ओलांडले का, या दिशेनेही तपास सुरू आहे.
सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणी परिसरातील गावकऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. मृत तरुण आणि तरुणीबद्दल अधिक माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा मृत्यू कसा झाला आणि त्यांचे मृतदेह इथे कसे पोहोचले, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत.