जैसलमेर : राजस्थानमध्ये जैसलमेर जिल्ह्यात भारत - पाकिस्तान सीमेजवळ दोन मृतदेह आढळले. यातील एक मृतदेह अल्पवयीन मुलीचा आहे. या मुलीचे वय १५ आहे. या व्यतिरिक्त एका तरुणाचाही मृतदेह आढळला आहे. मृतदेहांची अवस्था बघता मृत्यू आठवडाभर आधी झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काय आहे प्रकरण?
जैसलमेरमधील तनोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत, भारत-पाकिस्तान सीमेच्या तारेच्या कुंपणापासून सुमारे १०-१२ किलोमीटर आत भारतीय हद्दीत हे मृतदेह सापडले आहेत. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहांची तपासणी केली असता, त्यांच्याजवळ पाकिस्तानी सिम कार्ड आणि ओळखपत्रे (आयडी कार्ड) आढळून आली. त्यामुळे मृत पावलेले हे दोघे पाकिस्तानी नागरिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मृतदेहांची ओळख पटली
आढळलेल्या ओळखपत्रांनुसार, तरुणाचे नाव रवी कुमार (वडील: दीवाना, पोस्ट ऑफिस: गुलाम हुसैन लिगारी, घोटकी, सिंध, पाकिस्तान) असे आहे. तर अल्पवयीन मुलीचे नाव शांती बाई (वडील: गुलोजी) असे आहे. हे दोघेही पाकिस्तानमधील एकाच जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
तपासात गुंतलेल्या यंत्रणा
या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा, सीमा सुरक्षा दल (BSF) आणि जैसलमेर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी रामगड सीएचसीच्या शवागारात पाठवण्यात आले असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.
अनेक शक्यतांचा तपास
पोलिसांनी या प्रकरणात अनेक शक्यतांचा विचार करत तपास सुरू केला आहे
पाकिस्तानी घुसखोरी: हे दोघे पाकिस्तानी नागरिक असून, त्यांनी तारबंदी ओलांडून भारतात घुसखोरी केली असावी का?
भारतात वास्तव्य: ते व्हिसावर जैसलमेरमध्ये राहत होते का?
मृत्यूचे कारण: त्यांचा मृत्यू कसा झाला आणि त्यांचे मृतदेह भारतीय हद्दीत कसे पोहोचले?
या सर्व पैलूंवर कसून चौकशी सुरू आहे. आसपासच्या गावांमध्येही याबाबत चौकशी केली जात आहे. या घटनेमागे पाकिस्तानचा कोणताही नवा डाव आहे का, या दिशेनेही तपास यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या घटनेमुळे सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.