साकिब नाचनचा शनिवार २८ जून २०२५ रोजी दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी मृत्यू झाला. तो २००२-०३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सिमी आणि आयसिस या भारतात बंदी घातलेल्या संघटनांसाठी तो काम करत होता. दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात होता.
डिसेंबर २०२३ मध्ये, एनआयएने अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने त्याला महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील पडघा गावातून इतर १५ जणांसह अटक केली. आयएसआयएसच्या निर्देशानुसार तो बॉम्ब तयार करत होता. भारतात दहशतवादी हल्ल्यांसाठी कट रचणे, हल्लेखोरांना आवश्यक ती मदत पुरवणे ही कामं तो करत होता.
साकिब नाचन तरुणांना 'बयात' म्हणजेच आयसिसच्या खलिफाच्या निष्ठेची शपथ घेण्यास भाग पाडून संघटनेत भरती करत होता. पडघाला मुक्त क्षेत्र घोषित करून त्याने तिथे कट्टर (मूलतत्ववादी) विचार पसरवण्याचे काम सुरू केले होते.
साकिब नाचनच्या नेतृत्वात २००२ - ०३ मध्ये मुंबईत विलेपार्ले, मुलुंड आणि मुंबई सेंट्रल येथे बॉम्बस्फोट करण्यात आले. या तीन स्फोटांमुळे मुंबई हादरली होती. बॉम्बस्फोटांत १३ जणांचा मृत्यू झाला होता आणि ११६ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणात दहा जणांना दोषी ठरवले होते. दोषींपैकी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.