'समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, परंतु हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत'

  58

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सरकारला इशारा


मुंबई : राज्य सरकारने त्रिभाषा संदर्भातील दोन जीआर रद्द केले आहेत. त्यावर राज ठाकरे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. या माध्यमातून ठाकरेंनी मराठीजनांचं अभिनंदन केले आहे. राज ठाकरेंनी सोशल मीडियावरून आपले म्हणणे स्पष्ट केले आहे.


राज्यात पहिलीपासून मराठी भाषा सक्तीची असल्याचे सांगून हिंदी भाषेची सक्ती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती विद्यार्थी हित लक्षात घेऊन निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


सरकारने त्रिभाषासंदर्भात जीआर काढल्यानंतर मराठीसाठी मुंबईत काढण्यात येणारे मोर्चेही रद्द करण्यात आले आहेत. याआधी ५ जुलैला मुंबईत मराठीचा एल्गारसाठी मोर्चा काढला जाणार होता. मात्र आता हे मोर्चे रद्द करण्यात आले आहेत.


 


पाहा काय म्हणाले राज ठाकरे?


ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटले की, इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले.  याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.


पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.


अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी ! ! !


हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.


आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये... त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे.


असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा.


मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन. 


राज ठाकरे ।

Comments
Add Comment

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील