आषाढ घन

  8

माेरपीस : पूजा काळे


किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो...
खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच...
केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाईन निर्भय;
गावाकाठच्या नदीत
होईन मी जलमय...
आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी...
बरा म्हणून हा इथे
दिवा पारवा पाऱ्याचा
बरी तोतऱ्या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा...


बा.सी. मर्ढेकरांची ही कविता आषाढ मासाचं सौंदर्य चित्र डोळ्यांसमोर उभी करते. आषाढात कोसळणाऱ्या पावसाचा जोर वाढत जाऊन, रिमझिम बरसणारा श्रावण हा दुसरा पावसाळी महिना ठरावा असं हे चैतन्य. वळवाच्या पावसानंतर आषाढापूर्वीची पेरणी फळाला यावी. चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणारे मानवीय डोळे आभाळातल्या विहंगम दृश्याच्या ओढीनं भरून यावे. ऋतूने कूस बदलावी, निरभ्रतेला काजळ तीट लावत, पाण्याने भरलेल्या काळ्याकुट्ट ढगांची जमवाजमव होताना तुफान गर्दी व्हावी. आभाळाला भरत यावं. घोंगावणाऱ्या वादळाने वाऱ्याच्या दिशा बदलत किनारा गाठावा. टपोऱ्या थेंबातून माणिक-मोती अंगावर झेलण्याचा अनुभव सृष्टीने द्यावा. पहिल्या वहिल्या गारेगार पावसाच्या शिडकाव्याने अंगावर रोमांच उठावे. अनवट वळणाशी स्थिरावलेल्या गाण्याच्या एकेक ओळी मनपटलावर याव्या. कवितेतला झिम्माड पावसाच्या निसर्गगानानं सुरू व्हावा. अशावेळेस झरझरू लागणाऱ्या काव्यपंक्ती, ओलेत्या चिंब वातावरणातली अवस्था बिकट करू पाहतील. “नभ उतरू आलं, चिंब थरथर वलं, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात.” “ ये रे घना ये रे घना न्हावूं घाल माझ्या मना.” चं दान मागतील. यासम पाऊसगाणी ताल धरून नाचू लागतील. पाऊस पाण्याचा खळखळाट वाढत जाईल. धरणीचा तळ गाठण्यास जलबिंदू मातीत मिसळतील. कात टाकण्याच्या समेवर निसर्ग तृषार्थ भावनेचा नवचैतन्यरूपी कोंब रुजवेल. झाडंवेलींना पालवी फुटण्याच्या काळात तृप्तीच्या मिलनातून तयार झालेली पाणथळ हिरव्या रंगाचा सडा शिंपडेल. अमृत धारेतल्या शुभ्र माणिक मोत्यांनी अवनी सुशोभित व्हावी असा हा सर्वश्रेष्ठ आषाढमास, ज्याचं कौतुक करायला मलाही आवडतं. सृजन-प्रेमाचं प्रतीक असलेला पाऊस मला तुझ्यात दिसतो. लयदार, रिमझिम निळ्या, हिरव्या सरींतल्या पाऊसधारा तुझ्या अंतरंगात वसतात. मळभ साचू न देता, अळवावरच्या थेंबाप्रमाणे टप...टप... करत तुझं वाहणं. दयानंद, कृपावंताचा एक ओलसर कोपरा सदैव भरलेला असतो तुझ्यात. घालमेल न दाखवता, तुझी सर शांत करते प्रत्येकास. तू मोठा होतोस सगळ्यांपेक्षा. हे घना तू पावसाची सर नसून, नवनिर्मितीची खाण आहेस. “आषाढस्य प्रथम दिवसे” कवी कालिदासाच्या निर्मितीचे आम्ही उपासक, अभ्यासक आहोत. महाकवी कालिदासांनी संस्कृत भाषेत अलौकिक साहित्यरत्न निर्माण केली. त्यापैकी कल्पनेचा अत्युत्तम अाविष्कार म्हणजे मेघदूत. ही कल्पना सृष्टी उभी करताना, कवीने वास्तवाचे भान ठेवलयं, हेचं या काव्याचे वैशिष्ट्य होय. घनाला दूत बनवून पाठवलेल्या संदेशामध्ये प्रियेच्या अद्भुत सौंदर्य वर्णनाने अवाक होतो आपण. कर्तव्यभ्रष्ट पत्नीपासून विलग झालेल्या यक्षाचा विरह म्हणजे स्त्री-पुरुषातील उत्कटता, सृजनाच्या प्रेरणेमधील अस्फुट हुरहूर या भावनांना स्पर्श करणार आषाढ घनातल “मेघदूत काव्य” जगातील सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे.


रे थांब जरा आषाढघना,
बघुं दे दिठी भरुन तुझी करुणा...
कोमल पाचूंची हीं शेतें,
प्रवाळमातीमधलीं औतें...
इंद्रनीळ वेळूंची बेटे,
या तुझ्याचं पदविन्यासखुणा...
रोमांचित ही गंध केतकी,
फुटे फुले ही सोनचंपकी...
लाजून या जाईच्या लेकी,
तुज चोरून बघती पुन्हा पुन्हा |


निसर्गकवी बा. भ. बोरकरांच्या या नादमय रचनेत ओघवत्या शब्दकळांचा उत्सव पाहायला मिळतो. कोसळणाऱ्या आषाढातील घनाला उद्देशून या कवितेचा जन्म झाला असावा. पावसामुळे सृष्टीतले सौंदर्यमय बदल वाचताना आपलाही जीव ओला होतो. आश्लेषा नक्षत्रातल्या कुंद वातावरणात घनकृपा झालेल्या आभाळ मायेमुळे निर्माण झालेले सौंदर्य डोळे भरून पाहतो. कोवळ्या हळदी अंगाची उन्हं, हिरवी पिकं, कोमल पाचूंची शेतं, प्रवाळासारखी माती, वेळूच्या बेटाचे वर्णन करणारे इंद्रनील, फुलपाखरू पंखावरील रत्नतेजाच्या रत्नकळा, रोमांचित करणारा गंध केतकीचा, फुलणारी सोनचंपकीची फुले, लाजणाऱ्या जाईजुईच्या लेकी, थोडीशी उघडीप करून गगन मोकळे कर सांगणारे कवी मन आषाढघन थांबण्यासाठी आतूरलय. निर्माण झालेले मोजकेचं सृष्टी सौंदर्य डोळ्यांत साठवावे, म्हणजे संथ पाण्यातले चंद्रबिंब, गुंजन करणारे पक्षी, फुलांमध्ये साठलेला मध, या टपटपणाऱ्या थेंबाच्या सामर्थ्यात आषाढमेघांच्या विसाव्यात काही काळ निसर्गात घडलेली जादुई किमया पाहण्याची संधी द्यावी. आषाढ मेघ थांबला तर लालसर मातीतील हिरवीगार शेतं, वेळूंची बेटं, केवडा, सोनचाफा, लाजरी जाई यांची नजाकत पाहता येईल. निसर्गाच्या चमत्काराचं अप्रूप बोरकरांच्या कवितेत आढळतं. हे पावसा तू हवा आहेस तरी, एखाद्या वळणावर थोडं थांबून विश्रांती घेत जा, या अर्थाने आषाढ घनाला क्वचितच रोखणारी अवस्था वरील कवितेचा गाभा दर्शवते. कवींच्या भावावस्थेतून आषाढ घन अनेक रूपात दिसेल हे या कवितेचं महत्त्वाचं अंग आहे. माऊलीच्या भेटीसाठी निघालेल्या भक्तिसागरावर आनंदाच्या सरी बरसणारा आषाढघन बाप होऊन वावरताना पाहिला की, ऊर भरून येतो. आषाढाबद्दल असलेली एक गोष्ट अशी आहे, अकबर बादशहाने विचारलेल्या एका महत्त्वाच्या प्रश्नावर सर्वांचे डोळे उघडले होते. प्रश्न असा होता, बारा ऋतूंपैकी सर्वांत श्रेष्ठ ऋतू कोणता? इतरांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बादशहाने तोच प्रश्न बिरबलाला विचारला. त्याने जे उत्तर दिले ते अलौकिक होते. चतुर बिरबल इतकंच म्हणाला...” आषाढात पाऊस पडला नाही, तर बाकीचे ऋतू शून्य आहेत. पण आषाढात पाऊस पडला, तर इतर ऋतूचं सर्वश्रेष्ठ गणले जातील. आपण सुज्ञ आहात याच वेगळं स्पष्टीकरण द्यायला नको. जाता जाता एवढंच म्हणावसं वाटतं की...


ढंग आगळ्या पावसाचे |
रंग वेगळ्या आषाढाचे |
वेध लागले मज धारा झेलण्याचे |
शब्दामधूनी व्यक्त होण्याचे ||

Comments
Add Comment

नौदलात थेट भरती

करिअर : सुरेश वांदिले भारतीय नौदलामार्फत १०+२ (बी. टेक) कॅडेट एन्ट्री स्किम (योजना) राबवली जाते. यासाठी मुलांसोबत

‘वंदे भारत‌’मुळे नव्या काश्मीरची उभारणी

विशेष : प्रा. सुखदेव बखळे कतरा ते श्रीनगर या ‌‘वंदे भारत एक्स्प्रेस‌’ला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवणे हे केवळ

मुले मोठी होताना...

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू टीनएजर्सना वाढवणं जेवढं कठीण तेवढेच टीनएजर होणंही अवघड. असं का बरं? कारण आपल्या

सोशल मीडिया आणि वैवाहिक जीवन

आरती बनसोडे (मानसिक समुपदेशक, मुंबई ) पूर्वीचा काळ आणि हल्लीचा काळ यामध्ये मोठा बदल झाला आहे तो म्हणजे वाढत्या

ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांची ओळख ज्योतिषी, पंचागंकर्ते आणि धर्मशास्त्राचे गाढे

इव्हेंट मॅनेजमेंट कसे करावे

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे माणूस हा सामाजिक प्राणी. समाजामध्ये निरनिराळ्या कार्यक्रमांमधून, समारंभातून तो