
पालघरसह २० गावांना शोधावा लागणार दुसरा पर्याय
गणेश पाटील
पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्रासह नजीकच्या २० गावांना वाढीव पाणी मिळावे म्हणून सूर्या प्रकल्पातील पाणी आरक्षण वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र सिंचन क्षेत्रासाठी राखीव पाण्याव्यतिरिक्त या प्रकल्पातून देण्यासाठी पाणीच शिल्लक नाही. त्यामुळे पालघर व नजीकच्या गावांना वाढीव पाणी मिळणार नसल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आल्याने वाढीव पाण्याबाबत लवकरच ठोस निर्णय न झाल्यास पालघरमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण योजना विभाग ठाणे यांच्याकडून सूर्या नदीवर मासवण बंधाऱ्याच्या बाजूस पुरवठा विहीर खोदून पालघर व २६ गावे योजना १९९७ मध्ये तयार करण्यात आली. २६ जुलै २००४ रोजी या कामाचे आदेश देण्यात आले असून, ही योजना तयार करताना २७ गावांमधील सन १९९१ च्या जनगणनेनुसार ७१ हजार ७०३ लोकसंख्येचा विचार करण्यात आला आला. तसेच सन २०१५ पर्यंत १ लाख २५ हजार ५१० ही लोकसंख्या गृहीत धरून सन २०१५ पर्यंत दररोज ८ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. तर २०३१ पर्यंत १ लाख ७६ हजार ४३० लोकसंख्येचा विचार करता १२.२० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्याचे नियोजन ठरविण्यात आले. मात्र ग्रामीण व शहरी भागातील लोकसंख्या वाढल्याने प्रत्यक्षात पालघर नगर परिषद क्षेत्रासह नजीकच्या २० गावांसाठी दररोज शेलवाली जलशुद्धीकरण केंद्रातून १४ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.
सन २०११ मध्ये सदर योजना नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आली असून, ग्रामीण भागातील ६ गावे पालघर नगर परिषदेमध्ये समाविष्ट झाल्याने पालघर नगर परिषद क्षेत्रासाठी ८ दशलक्ष लिटर, जिल्हा मुख्यालयातील शासकीय कार्यालय १ आणि ग्रामीण भागातील २० गावांसाठी ५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज करण्यात येत आहे. दरम्यान, आता पडघे व १९ गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत २८ कोटी ७६ लक्ष रुपयाची नवीन योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पालघर नगर परिषद मार्फत होणारा पाणीपुरवठा बंद करून जलशुद्धीकरण केंद्रावरून स्वतंत्र टॅपिंग कनेक्शन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र या प्रकाराला पालघरमधील शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वतंत्र कनेक्शन जोडण्यात आलेले नाही.
याच मुद्द्यावरून आता ग्रामीण भागातील सरपंच आणि नगरपरिषदेचे माजी पदाधिकारी यांच्यात पाणी वाद सुरू झाला आहे. या संपूर्ण प्रकरणात मात्र पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांची अडचण झाली आहे. पालघर नगर परिषद क्षेत्रासह ग्रामीण भागातील नागरिकांनाही आवश्यक पाणी पुरवठा व्हावा अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाणी आरक्षण वाढविण्यासोबतच नगर परिषदेच्या प्रस्तावित योजनेला लवकर मान्यता देण्याची मागणी केली आहे. मात्र सूर्या प्रकल्पात ठरविण्यात आलेले पाणी आरक्षण पूर्ण झाले असून, सिंचनासाठीच्या पाण्या व्यतिरिक्त या प्रकल्पात पाणी शिल्लक नसल्याने पालघर नगरपरिषदेला वाढीव पाणी मिळणार नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे. परिणामी वाढीव पाण्याबाबत लवकरच नियोजन न झाल्यास पालघरमध्ये "पाणीबाणी" पाहावयास मिळणार आहे.