आश्रमशाळेतील विद्यार्थी, कर्मचारी, पर्यटकांसह ग्रामस्थांचा जीव टांगणीला
सुधागड-पाली : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सुधागड तालुक्यातील पडसरे गावाला जोडणारा पुल अक्षरशः मोडकळीस आला असून धोकादायक अवस्थेत आहे. हा पुल पडसरे गावाला व येथील आदिवासी आश्रमाशाळेला सुधागड तालुक्यातील सर्व गावांशी जोडतो. परिणामी पडसरे आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, येणारे पर्यटक व ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे.
या पुलाचे संरक्षण कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. संरक्षक कठड्याच्या लोखंडी सळया बाहेर निघाल्या आहे. सध्यातर संरक्षण कठाडेच उरलेले नाहीत. परिणामी वाहने व पादाचारी पुलाखाली कोसळून अपघाताची शक्यता आहे. याशिवाय पुलाच्या खालील स्लॅब जीर्ण झाला असून स्लॅबच्या सळ्या देखील बाहेर निघाल्या असून त्या खाली लोंबकळत आहेत. एप्रिल २०१८ साली या पडसरे पुलाची व येथील प्रसिद्ध अशा धबधब्याची तत्कालीन रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी पाहणी केली होती. व त्यांनी पुल दुरुस्ती बाबत संबंधित विभागाला तात्काळ सूचना दिल्या जातील असे सांगितले होते.
मात्र आजतागायत पुलाची कोणतीच डागडुजी केली गेलेली नाही. या पुलाचा वापर पडसरे, लोळगेवाडी, एकलघर, महागाव, देउळवाडी, कवेलेवाडी, कोंडक आदिवासीवाडी, भोप्याचीवाडी, गोमाशी आदिवासीवाडी आदी गावातील नागरीक करतात. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक देखील या पुलाचाच वापर करतात. या पूला खालुनच धबधब्याचे पांढरे खळखळणारे पाणी वाहते. या मार्गावर वाहनांची वर्दळ सुरु असते. पुलावरून नागरिकांची देखील रेलचेल सुरु असते.
पडसरे आदिवासी आश्रमशाळेत देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असतात. त्यामुळे येथील रस्ते व नदी पुल सुस्थीतीत व सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेवून भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने पडसरे पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी. व सर्वांना दिलासा द्यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांनी केली आहे.
या पुलाची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. हा पूल कधीही कोसळू शकतो. गेली तीन ते चार वर्षे पाठपुरावा करून देखील अजून तीच परिस्थिती आहे. शासन एखादा अपघात होण्याची वाट पहात आहे का असा प्रश्न पडतो. तरी शासनाने वेळीच दखल घेऊन या पुलाची दुरुस्ती करावी किंवा या ठिकाणी नवीन पूल बांधावा
- रवींद्र लिमये, अध्यक्ष, कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ, पाली