हिंदी सर्व भारतीय भाषांची सखी!
नवी दिल्ली : हिंदी भाषा कुठल्याही भारतीय भाषेची शत्रू नाही. हिंदी सर्व भारतीय भाषांची सखी आहे. हिंदी आणि इतर भारतीय भाषा मिळून आपल्या स्वाभिमान कार्यक्रमाला अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचवू शकतात. मागील काही दशकांपासून भाषेचा वापर भारतात विभागणी करण्यासाठी होत आहे. ते भारताला तोडू शकत नाहीत पण प्रयत्न करत आहेत. आपल्या भाषा भारताला एकजूट करण्यासाठी सशक्त पर्याय बनतील, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. गुरुवारी नवी दिल्लीत राजभाषा विभागाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीच्या विरोधात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शाह यांनी उपरोक्त भाष्य केले.
शाह पुढे म्हणाले की, भारतीय भाषा जिवंत ठेवणे आणि त्यांना समृद्ध करणे महत्वाचे आहे. येणाऱ्या काळात आपण सर्व भारतीय भाषांसाठी, विशेषतः अधिकृत भाषेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती राष्ट्राचा आत्मा आहे. प्रत्येकाने गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त झाले पाहिजे आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला त्याच्या भाषेचा अभिमान वाटत नाही किंवा तो स्वतःच्या भाषेत आपले विचार व्यक्त करत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होऊ शकत नाही.
देशात जेईई, नीटच्या परीक्षा एकूण तीन भाषांमध्ये होत आहेत. याआधी सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी लोकांकडे हिंदी आणि इंग्रजीचा पर्याय होता. केवळ या दोन भाषांतच अर्ज भरू शकत होते, मात्र आम्ही त्यात अन्य १३ भाषांमध्ये परीक्षा देण्याची परवानगी दिली. देशातील ९५ टक्के उमेदवार आज त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देत आहेत. येणाऱ्या काळात भारतीय भाषांचे भविष्य उज्ज्वल आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अधिकाधिक भाषा विभागावर काम करत आहोत. २०४७ मध्ये महान भारत विकसित होईल. यात भारतीय भाषांचा विकास, समृद्धतेसाठी त्याचा वापर वाढेल. त्याशिवाय सरकारी कामकाजात भारतीय भाषांचा वापर जास्तीत जास्त व्हायला हवा. हे काम केवळ केंद्र सरकारच नाही तर राज्य सरकारनेही करायला हवे. त्यासाठी आम्ही सर्व राज्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना समजावून तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही शाह म्हणाले.