कल्याण: गेल्या काही दिवसांपासून महागाई प्रचंड वाढली आहे. त्यातच आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक चटका बसणार आहे. कारण आता कल्याण आरटीओ क्षेत्रातील प्रवाशांना रिक्षा प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ यांसारख्या शहरांमध्ये शेअर रिक्षाची भाडेवाढ लागू (Share Auto Rent Hike) करण्यात आली आहे. आजपासून (सोमवार, 23 जून 2025) ही नवी भाडेवाढ जाहीर केली जाणार आहे.
कल्याण आरटीओ क्षेत्रात २३ जून २०२५ पासून शेअर रिक्षाचे भाडे ३ ते ५ रुपयांनी वाढले आहे. तीन महिन्यापूर्वी जाहीर झालेली ही वाढ रिक्षांच्या मीटरच्या पुनर्मानांकनामुळे उशीरा लागू झाली. इंधन किमती आणि देखभाली खर्च वाढल्याने ही वाढ आवश्यक असल्याचे रिक्षा संघटना म्हणतात.
दरवाढीमागील कारण काय?
आधीच दैनंदिन गरजा आणि इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यात आता रिक्षा प्रवासाच्या वाढीव खर्चामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी ताण पडणार आहे. दुसरीकडे, रिक्षा संघटनांनी वाढत्या इंधनाच्या किमती आणि देखभालीचा खर्च लक्षात घेता, ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रवाशांनी ती स्वीकारावी, असे आवाहन केले आहे.
भाडेवाढ तीन महिन्यांपूर्वीच जाहीर, लागू आजपासून
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने ही भाडेवाढ तीन महिन्यांपूर्वीच जाहीर केली होती. मात्र, रिक्षांच्या मीटरचे पुनर्मानांकित (recalibrated) पूर्ण न झाल्यामुळे ती आतापर्यंत लागू झाली नव्हती. आता आरटीओ क्षेत्रातील सुमारे 95% रिक्षांचे मीटर पुनर्मानांकित झाल्याने, रिक्षा चालकांनी आजपासून नवीन दर आकारण्यास सुरुवात केली आहे.
किती असणार भाडेवाढ?
शेअर रिक्षाच्या भाड्यात अंतरानुसार 3 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे, तर मीटरमध्येही प्रति प्रवासामागे 3 रुपयांची वाढ लागू करण्यात आली आहे. या भाडेवाढीमुळे नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. दररोज कामावर जाण्यासाठी किंवा इतर प्रवासासाठी रिक्षावर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांना आता या वाढीव आर्थिक बोज्याला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे सर्वसामान्यांनी संताप व्यक्त केला आहे.