वैष्णवी भोगले
"कोकण म्हणजे केवळ निसर्गसौंदर्य नव्हे, तर संधींचा महासागर आहे” हा दृष्टिकोन घेऊन ना. नितेश राणेंनी कोकणात विकासकामांचा जो झपाटा लावला, त्याने कोकणच्या चेहऱ्याला खरंच नवा साज चढवला आहे.
कोकण आणि सिंधुदुर्गच्या राजकीय वाटचालीत एक कणखर, तडफदार आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून नितेश राणे यांच्याकडे पाहिलं जातं. सामाजिक, राजकीय जीवनात वावरताना नितेश राणेंचा नेहमी आक्रमकपणा समस्यांना तडीस नेण्यासाठी असतो. जो कार्यकर्ता आपल्यासाठी आणि पक्षासाठी अहोरात्र मेहनत करतो, त्याला न्याय देण्याची भूमिका नितेश राणे हे नेहमीच करत असतात. कोकणातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या सुखदु:खात नितेश राणे यांचा सहभाग असतो. जणू काही आपल्याच कुटुंबातील व्यक्ती असल्याप्रमाणे ते प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये सहभागी होतात. त्यामुळेच प्रत्येक कोकणकरांच्या मनात त्यांनी किंगमेकरची भूमिका बजावली आहे. त्यामुळे नितेश राणे तडफदार आणि विकासाभिमुख नेतृत्व असल्याने प्रत्येक तरुणांच्या मनात त्यांच्या आदरणीय भावना रुजताना दिसत आहेत. नितेश राणे हे नव्या सळसळत्या रक्ताचे आक्रमक नेतृत्व म्हणून युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. भाजपामध्ये प्रवेश करताच त्यांचे हिंदुत्वाशी सूत जुळल्याने तरुण वर्ग नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यामुळे संपूर्ण राज्यात हिंदू जागरणाचे नितेश राणे यांनी केलेले कार्य मोलाचे आहे.
कोकणात अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे खराब रस्ते होते. नितेश राणे यांनी तळेरे, वैभववाडी, कणकवली, मालवण, आचरा, देवगड, वेंगुर्ला या भागांत ग्रामीण रस्त्यांचं डांबरीकरण, तसेच नवे पूल बांधून खेड्यांना तालुक्यांशी जोडले. काही भागांमध्ये प्रथमच २४ तास वीज पुरवठा सुरू केला. “घराघरांत वीज आणि रस्त्याने दळणवळण” हे त्यांचं घोषवाक्य अनेक गावांत सत्यात उतरलं. मुंबई-गोवा प्रवास जलमार्गे करण्यासाठी रो-रो फेरी सेवा सुरू करण्यासाठी नितेश राणे यांनी पुढाकार घेतला. यातून कोकणातील पर्यटनाला चालना मिळाली आणि स्थानिकांना मुंबईशी जलमार्गाने कमी वेळात जोडणं शक्य झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे “सागरी प्रवासाचं प्रवेशद्वार” म्हणून विकसित करणं हे त्यांचं मोठं स्वप्न आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची भरती, नवीन उपकरणांची खरेदी, ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली. जिल्हा रुग्णालयात आयसीयू, डायलिसिस सेंटर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. सरकारी शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड यांसारख्या डिजिटल उपकरणांचा पुरवठा केला. गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाभिमान शिष्यवृत्ती’ योजना चालवून गरीब मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतदेखील केली. एमआयडीसीचा विस्तार करून स्थानिक तरुणांसाठी लघुउद्योग, अन्न प्रक्रिया केंद्र, सी-फूड पॅकेजिंग युनिट्स सुरू केली. मालवण, देवगड, तारकर्ली, वेंगुर्ला याठिकाणी टूरिझम क्लस्टर तयार केले. स्कुबा डायविंग, बोटिंग, कॅम्पिंग यास नितेश राणे यांनी प्रोत्साहन दिले. मच्छीमार बांधवांसाठी नवे जेटी बांधकाम, मासळी कोल्ड स्टोरेज, सोलार कोल्ड स्टोरेज युनिट्स देखील स्थापन केल्या. हॉटेल बांधकाम परवानग्या सुलभ केल्या, स्थानिकांना हॉटेलिंग व रिसॉर्ट व्यवसायात मदत दिली.
तसेच नितेश राणे यांची “कोकणात नोकऱ्या तयार करा, तरुणांना स्थलांतर नको” अशी त्यांची ठाम भूमिका होती. नितेश राणे यांचा “युवा नेता” म्हणून जो प्रभाव आहे, तो केवळ त्यांच्या वयामुळे नाही, तर त्यांच्यातली जिद्द, बेधडकपणा आणि समस्यांशी थेट भिडण्याची वृत्ती यामुळे आहे. नितेश राणे कधीच राजकीय भाषा बोलत नाहीत. त्यांची भाषाशैली थोडी टोचणारी असली तरी प्रामाणिक आणि स्पष्ट असते. युवावर्गाला “डायलॉग नाही, डायरेक्ट अॅक्शन” हवे असते आणि नितेश राणे नेमकं तेच करतात. युवांसाठी काहीतरी करावे यावर ते पहिल्यापासूनच ठाम होते. याचे उत्तम उदा. म्हणजे जेव्हा त्यांनी स्वाभिमान पक्ष काढला, तेव्हा पहिले मासिक काढले त्याचे नावही त्यांनी ‘युवा’ असे ठेवले होते. त्यातून युवा वर्गाला एक नवीन दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले. स्वाभिमान संघटना ही संघटना स्थानिक तरुणांना संघटित करत सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय कामांमध्ये सामावून घेण्याचे एक शक्तिशाली प्लॅटफॉर्म आहे. रोजगार मेळावे, करिअर गाईडन्स, वॉटर कंझर्वेशन ड्राईव्ह, रक्तदान शिबिरे, रोड सेफ्टी कॅम्पेन अशा अनेक उपक्रमांत युवकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. तसेच नितेश राणे हे नेहमीच सोशल मीडियावरून युवा प्रश्नांना प्रतिसाद देतात. त्यांच्या पोस्टमध्ये संवेदनशीलता आणि ठाम भूमिका असते. विशेषतः बेरोजगारी, परीक्षा घोटाळे, स्थानिक प्राधिकरणांच्या हलगर्जीवर त्यांनी वेळोवेळी तरुणांसोबत आवाज उठवला आहे. शैक्षणिक आणि करिअरच्या बाबतील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी फॉर्म फी, परीक्षा फी, क्लासेससाठी निधी पुरवला आहे. नोकरीच्या संधीसाठी उद्योगधंद्यांना तरुणांची माहिती पुरवून ‘युवा-योजक’ नेटवर्क उभारले आहे. कोणताही उत्सव असो, अपघात असो किंवा आजार - नितेश राणे स्वतः तिथे पोहोचतात. कार्यकर्त्यांना “सरकारकडून काम होईपर्यंत थांबायचं नाही” अशी प्रेरणा देतात - हे युवांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. त्यामुळे युवकांना वाटतं की, “हा माणूस चुकतो पण जबाबदारी घेतो” - ही बाब एक मोठं ट्रस्ट एलिमेंट ठरते. तसेच दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नित्यनेमाने गणपती विशेष गाड्या सोडल्या जातात. त्यामुळे राणे कुटुंब आणि कोकणवासीयांचे नाते अधिकच जवळकीचे बनले आहे.