
भाईंदर : भाईंदर पूर्वेकडील इंद्रलोक भागातील रस्ता खचून झालेल्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेऊनही महापालिकेने दुर्लक्षित केल्यावर त्या रस्त्याचे बिल्डरने हाती घेतलेले दुरुस्तीचे काम एमएमआरडीएच्या अभियंत्यांनी पाहणी केल्यावर नियमानुसार होत नसल्याचे आढळून आल्याचे पत्र महापालिकेला दिले आहे.
भाईंदर पूर्वेकडील इंद्रलोक भागातील तपोवन शाळे जवळच्या सीसी रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी एमएमआरडीएकडून करण्यात आले होते. याच रस्त्यालगत आरएनए बिल्डरच्या गृहप्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले, या इमारतीच्या पोडियमसाठी खोदकाम करताना बिल्डरने रस्त्याखालील जमीन खचणार नाही, यासाठी कोणतीही खबरदारी घेतली नाही. परिणामी १७ मे रोजी या रस्त्याखालची जमीन खचल्याची घटना घडली होती. एमएमआरडीएने त्या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी बिल्डरवर निश्चित केली होती. तसे पत्र एमएमआरडीएने पालिकेला १९ मे रोजी पाठविले. यानंतरही बिल्डरने त्या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात केली नाही. अलिकडेच बिल्डरने रस्त्याच्च्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी ते नियमानुसार केले जात नसल्याचे एमएमआरडीएच्या निदर्शनास आले. त्यांनी त्या कामाचा आढावा घेत पालिकेला ११ जून रोजी पत्र पाठवून त्या रस्त्याची होत असलेली दुरुस्ती निकृष्ट दर्जाची असून भविष्यात होणाऱ्या नुकसानीला बिल्डरच जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. तसेच बिल्डरने त्याच्या जागेत खोदकाम करताना कोणतीही सुरक्षा वा उपाययोजना केली नसल्यानेच निष्काळजीपणामुळे रस्त्याखालची जमीन खचल्याचे एमएमआरडीएने या पत्रात नमूद केले आहे.