
या स्कायवॉकवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे पादचारी, रेल्वे प्रवासी, बाजारहाट करण्यासाठी ये-जा करणाऱ्या गृहिणींना नाक मुठीत धरून चालावे लागते. चोहोबाजूंनी थुंकलेल्या भिंती, कोपऱ्या-कोपऱ्यात कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि प्रचंड घाण, याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. स्वच्छ भारत अभियानाची खिल्ली उडविणाऱ्या या स्कायवॉककडे सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महापालिकेला स्वच्छता कर, तर रेल्वे प्रशासनाला प्रवासाचे शुल्क भरूनही कुणालाही स्वच्छतेची जबाबदारी घ्यायची नाही. नेहमीप्रमाणे या भागाची जबाबदारी झटकणाऱ्या संस्था एकमेकांकडे बोट दाखवणार आणि जनतेच्या सहनशीलतेचा फायदा घेत मोकळ्या होणार. दरम्यान प्रशासन जर हात झटकून मोकळे होणार असेल, तर करसंकलन बंद करावे आणि नागरिकांनी स्वतः झाडू घेऊन स्वच्छता करावी का? असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.