
रत्नागिरी : कोकणात मोठ्या स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे जादा गाड्यांसह नियमित गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण २३ जूनपासून सुरू होत आहे.
कोकणात साजरा होणारा गणेशोत्सव मागील वर्षीपेक्षा यावर्षी लवकरच म्हणजे दि. २७ ऑगस्टला साजरा होणार आहे. यासाठी कोकणातील चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी ६० दिवस आधीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करावे लागणार आहे. कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे आरक्षण २३ जूनपासून सुरू करावे लागणार आहे.
दि. २५ आणि दि. २६ ऑगस्टला कोकणात पोहचण्यासाठी त्या दोन दिवसांच्या गाड्यांच्या आरक्षणाला जादा मागणी असते.कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत असल्यामुळे मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर २५०हून अधिक गणपती स्पेशल गाड्यांना सोडते, या गाड्यांनादेखील मोठी गर्दी असते. मुंबई-गोवा मार्गाची अवस्था अद्यापही बिकट असल्यामुळे यावर्षीदेखील जास्त चाकरमानी रेल्वेतून प्रवास करण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने कोकण रेल्वेकडून तयारीला सुरुवात झाली आहे.