
तातडीने उपाययोजना करण्याची मनसेची मागणी
शहापूर: वासिंद शहरातील कल्याण व शहापूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या गेरसे वासिंद रस्त्यातील भातसा नदीवरील जुना गेरसे पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या पुलावरील संरक्षण कठडे अनेक ठिकाणी तुटलेले असून, पावसाळ्यात रस्ता ओला आणि निसरडा होत असल्यामुळे अपघाताची शक्यता प्रचंड वाढली आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी मनसेचे वासिंद शहराध्यक्ष अमोल बोराडे यांनी कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांजकडे निवेदन देऊन केली आहे.
पावसाळ्यात नागरिक, विद्यार्थी, दुचाकीस्वार, वाहतूक रिक्षा तसेच वृद्ध व्यक्तींना या पुलावरून जाताना जीव मुठीत धरावा लागतो. नुकतीच पुणे येथे झालेली इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित विभागाने सजग होणे आवश्यक आहे.
मनसेने आपल्या निवेदनात
१) अवजड वाहनांची वाहतूक त्वरित बंद करावी.
२) पुलाचे संरक्षण कठडे तातडीने दुरुस्त करावेत.
३)मंजूर नवीन पुलाच्या बांधकामास लवकरात लवकर सुरुवात करावी.
अशा उपाययोजना सुचविल्या आहेत. एवढेच नव्हे तर जर या गोष्टींकडे दुर्लक्ष करून भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी शहर अध्यक्ष अमोल बोराडे, शहर सचिव कल्पेश शेलार, शहर उपाध्यक्ष चेतन भोसले, उन्मेश साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.