रायगड: माणगाव तालुक्यात पावसाळी पर्यटनस्थळांवर वाढत्या अपघातांची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाद्वारे पर्यटकांसाठी काही प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. ज्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई देखील केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार पावसाळ्यात सर्वात जास्त गर्दीचे ठिकाण असलेले देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट, ताम्हीणी घाट परिसरासह रायगड येथील इतर प्रसिद्ध पावसाळी पर्यटनस्थळांचा समावेश आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रांताधिकारी संदीपान सानप यांनी काही प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशांनुसार पर्यटकांनी धबधब्यांच्या परिसरात दारूचे सेवन करणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा रिल्स बनवणे, उधळपट्टी करणे अशा कृतींना पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणं अत्यावश्यक
पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य अनुभवताना सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या असून, पर्यटकांनी नियमांचे पालन करूनच पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.