Tuesday, June 17, 2025

एअर इंडियाच्या विमानांना झालेय तरी काय? प्रवाशांचा जीव धोक्यात?

एअर इंडियाच्या विमानांना झालेय तरी काय? प्रवाशांचा जीव धोक्यात?

कोलकाता : एअर इंडिया कंपनीच्या बोईंग विमानांमध्ये गेल्या काही दिवसांत तांत्रिक बिघाडांची मालिकाच सुरू झाली आहे. १२ जूनला अहमदाबादमध्ये भीषण दुर्घटनेत २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पाच दिवसांतच अशा पाच मोठ्या घटना घडल्या.



तांत्रिक अडथळ्यांमुळे ‘AI180’ चे कोलकात्यात इमर्जन्सी लँडिंग


सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या एअर इंडियाच्या AI180 या विमानाचं सोमवारी मध्यरात्री नियोजित वेळेत १२ वाजून ४५ मिनिटांनी कोलकाता येथे लँडिंग झालं. पण विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे कोलकात्याहून मुंबईच्या दिशेनं विमानाचं उड्डाण लांबलं. जवळपास चार तासांहून अधिक काळ विमानतळावरच थांबल्यानंतरही सदर तांत्रिक समस्या दुरूस्त न झाल्यामुळे विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. सलग चार तास प्रयत्न करूनही बिघाड दुरुस्त न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. वैमानिकाने प्रवाशांना हे सांगितलं की, सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण रद्द केलं जात आहे.



सोमवारी दिवसभरात घडलेल्या इतर घटना


AI2493 (मुंबई–अहमदाबाद) : तांत्रिक व्यवस्थेतील अडचणीमुळे उड्डाण रखडले आणि क्रू मेंबर्सचा ड्यूटी कालावधी संपला, परिणामी संपूर्ण फ्लाइट रद्द!


AI (दिल्ली–रांची) : टेकऑफनंतर तांत्रिक बिघाडाची संशयास्पद लक्षणं आढळताच वैमानिकाने विमान पुन्हा दिल्लीला परत नेलं.


AI315 (हाँगकाँग–दिल्ली) : हाँगकाँगहून निघालेलं विमान हवेत गेल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडाची शंका आल्याने तत्काळ परतीचं निर्णय, विमान पुन्हा हाँगकाँगला उतरवण्यात आलं.



बोईंगची भीती, एअर इंडियाची निष्काळजीपणा?


या साऱ्या घटनांमुळे एकच मोठा प्रश्न निर्माण होतो की, एअर इंडियाची विमाने प्रवाशांसाठी सुरक्षित आहेत का? तांत्रिक बिघाडाच्या एकामागोमाग एक घटना आणि भीषण अपघाताने आता प्रवाशांचा विश्वास हादरत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उड्डाण करणाऱ्या भारतीय एअरलाइन्सकडून अशा निष्काळजीपणाची अपेक्षा न करता, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा