लंडन: जसप्रीत बुमराहने अखेर भारताच्या कसोटी कर्णधारपदाबद्दल आपले मौन सोडले आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीची पहिली पसंती तोच होता. मात्र, कामाच्या ताणामुळे त्याने भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद नाकरलं असल्याचं बुमराहने स्पष्ट केलं आहे.
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिलची भारताच्या कसोटी कर्णधारपदी निवड करण्यात आली. कसोटी संघाचा उपकर्णधार आणि रोहितच्या अनुपस्थितीत तीन कसोटी सामन्यांमध्ये म्हणजेच एक इंग्लंडमध्ये आणि दोन ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारा बुमराह रोहित शर्माचा उत्तराधिकारी असायला हवा होता. पण ऑस्ट्रेलियातील सिडनी कसोटीत त्याला झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे सर्व काही बदलले.
जसप्रीत बुमराहने एका मुलाखतीत सांगितले की, ‘’रोहित आणि कोहली यांनी गेल्या महिन्यात कसोटी निवृत्तीची घोषणा केली. आणि आयपीएल दरम्यान मी बीसीसीआय अधिकाऱ्यांशी आणि निवड समितीशी आपल्या कामाच्या ताणाबद्दल चर्चा केली होती. डॉक्टर आणि फिजिओंनी मला क्रिकेट कारकीर्दी वाढवण्यासाठी तंदुरुस्तीवर अधिक भर देण्याचा सल्ला दिला होता. आणि त्यामुळे मला कर्णधारपद सोडण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला.’’