मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं, अंधेरी सब वे पाण्याखाली

मुंबईसह कोकणात धुमाकूळ! मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत


मुंबई: उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून, अंधेरी सब वे पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक थांबवण्यात आली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक मंदावली आहे, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.


पवई, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे सखल भागांत पाणी भरण्यास सुरुवात झाली असून, लालबहादूर शास्त्री मार्गावर भांडूपजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.



राज्यात मान्सूनचा जोर, अनेक जिल्ह्यांत 'रेड' आणि 'ऑरेंज' अलर्ट


मान्सूनने संपूर्ण कोकण व्यापले असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे, तर संपूर्ण कोकणात पुढील दोन ते तीन दिवस मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


दक्षिण गुजरात परिसरात पुढील २४ तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याने, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील अमरावती, गोंदिया, भंडारा आणि नागपूरमध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः सातारा आणि पुण्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.


कोकणात नद्यांना पूर, जनजीवन विस्कळीत


संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. घाट परिसरातून प्रवास करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी १०० मिमीहून अधिक पावसाची शक्यता आहे.


मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली आहे. डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे परशुराम घाटातील गॅबियन वॉल ढासळण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. परशुराम घाटाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


राजापूर शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या संगमावर असलेल्या राजापूर शहरातील जवाहर चौकापर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.


सिंधुदुर्गातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली-आचरा राज्य मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे १५ ते २० गावांचा संपर्क तुटला असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.


सिंधुदुर्गात समुद्रालाही उधाण आले असून, किनाऱ्यावर ३ ते ३.५ मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाल्याने सखल भागात पाणी साचले आहे. होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे, तर तेरेखोल नदी इशारा पातळीवर वाहत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


कोल्हापुरातही पावसाची संततधार


कोल्हापुरात पावसाची रिपरिप सुरूच असून, पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १७ फूट १० इंचावर पोहोचली आहे. राजाराम बंधाऱ्यासह सात बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. राधानगरी धरणाच्या पायथा विद्युतगृहातून प्रतिसेकंद २५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. कुंभी धरणाच्या पायथा विद्युतगृहातूनही प्रतिसेकंद ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पात्रात पाण्याची मोठी आवक होत असल्याने भोगावती, पंचगंगा आणि कुंभी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील