मुंबई : हिंदुत्ववादी विचाराचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचे रविवारी विलेपार्ले येथे हृदयविकाराच्या तीव्र आघाताने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूसमयी त्यांचे पुत्र डॉ. मल्हार आणि केदार इहे मुंबईबाहेर असल्याने सोमवारी दुपारी दोननंतर मुंबई आय आय टी मधील निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यांच्या पार्थिवावर विक्रोळी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मंत्री नितेश राणेंचा सत्कार मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनी ...
आचार्य अत्र्यांच्या 'मराठा' मधून पत्रकारितेला प्रारंभ करणाऱ्या अरविंदरावांनी त्यानंतर दीर्घकाळ इंग्रजी भाषेतील 'मिड डे' मध्ये राजकीय संपादक या पदावर काम केले. त्यांनी आपली हिंदुत्त्व विचारधारा न लपवता वा सोडता व्रतस्थपणे इंग्रजी दैनिकात पत्रकारिता केली. महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत जवळून पाहणारा, त्यातून विविध पक्ष संघटनांच्या नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी निर्माण झालेल्या संबंधांतून राष्ट्रीय महत्वाच्या विषयावर आशयनिर्मिती करणारा, भाष्य करणारा एक लढवय्या पत्रकार म्हणून अरविंदराव यांची ओळख होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवार, पु. भा. भावे अशी श्रद्धास्थाने असलेल्या अरविंदरावांनी काही वर्षे साप्ताहिक विवेक, मासिक धर्मभास्करचे ही संपादन केले होते. 'हिंदुस्थान समाचार' ह्या राष्ट्रीय वृत्तसंस्थेचे मुंबईतील ब्युरोप्रमुख म्हणूनही त्यांनी लक्षणीय काम केले होते. अनेक तरुणांना राष्ट्रीय विचाराच्या पत्रकारितेचे धडे दिले होते. जवळपास दशकभर पु. भा. भावे स्मृतिसमितीचे कार्यवाह म्हणून त्यांनी मुंबई आणि परिसरात अनेक उपक्रम केले होते. गेली चार वर्षे ते 'अधोरेखित' नावाचा यु वाहिनीवर भाष्यपट प्रस्तुत करीत होते. त्यातूनही अनेक वैचारिक विमर्शाचे आणि हिंदुत्ववादी विचारांचे विषय मांडत असत.
त्यांचा ज्येष्ठ मुलगा डॉ. मल्हार मुंबई आयआयटीमध्ये संस्कृत भाषा विभागप्रमुख आहे तर केदार अरुणाचल प्रदेशात कल्याण आश्रमाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून गेली जवळपास दोन दशके काम करीत आहे. ओंकार कुलकर्णी हा त्यांचा धाकटा मुलगा इंग्रजी भाषेतील कवी असून चित्रपट आणि मालिका क्षेत्रात लेखक - अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे.