अंबरनाथकरांना मेट्रोचे गिफ्ट!

एमएमआरडीएला विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना


अंबरनाथ : अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर परिसरातील नागरिकांना नव्या मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ प्रकल्प विस्तार करून आता दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गाने थेट अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत पोहचणार आहे. यामुळे या भागातील रहिवाशांना थेट आणि जलद मेट्रो सेवा मिळणार असून चिखलोली हे स्थानक एक प्रमुख ट्रान्सपोर्ट हब म्हणून उदयास येणार आहे. बदलापूर - कांजूरमार्ग मेट्रो १४ च्या माध्यमातून अंबरनाथ,बदलापूर आणि आसपासच्या नागरिकांना थेट मुंबई गाठता येणार आहे. तर मेट्रो ५च्या या विस्तारामुळे नागरिकांना ठाणे गाठणे सोपे होणार आहे.


विशेष म्हणजे, चिखलोली रेल्वे स्थानकाच्या येथे रेल्वे आणि मेट्रोचे एकत्रीकरण होणार असल्यामुळे प्रवास सुलभ व सुसंगत होईल. यासाठी स्थानकाची तशा पद्धतीने उभारणी करण्यात येणार असून याबाबतचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएला दिल्या आहेत. एमएमआरडीएच्या मुख्यालयात याबाबत शुक्रवारी बैठक पार पडली. यावेळी बैठकीला आमदार डॉ.बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, रवी पाटील, राजेश कदम यांच्यासह एमआरडीए आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही या प्रकल्पासाठी मागणी केली होती.


कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मतदारसंघात वाहतुकीला नवा आयाम देणारे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल यांची सुसज्जता ठेवण्यास खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे विशेष प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर मेट्रो ५ आणि मेट्रो १४ या प्रकल्पांच्या विस्तारित टप्प्यांमुळे कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि बदलापूर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि लोकल गाड्यांवरील ताण कमी होईल. या दोन्ही मार्गांचे विस्तारीकरण झाल्याने कांजुरमार्ग मेट्रोचा प्रवासी उल्हासनगर, भिवंडीमार्गे ठाण्याला जाऊ शकेल. तर उल्हासनगरच्या प्रवाशाला चिखलोली स्थानकातून मुंबईला जाता येणार आहे.


शिवाय, पर्यावरणपूरक मेट्रोमुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळेल. या प्रकल्पांमुळे स्थानक परिसरात वाणिज्य, सेवा उद्योग आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल. या मेट्रो प्रकल्पांचा उद्देश केवळ वाहतूक सुधारणा नसून, एकत्रित नागरी विकास साधणे हा आहे. सध्या या मेट्रो प्रकल्पाचे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असून, लवकरच यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. हा मेट्रो प्रकल्प म्हणजे कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि चिखलोली या भागांच्या विकासाचा रोडमॅप ठरणार असून, 'एक शहर एक मेट्रो नेटवर्क' या संकल्पनेची सुरुवात यामुळे प्रत्यक्षात येणार आहे.


चिखलोली ठरणार ट्रान्सपोर्ट हब


मेट्रो ५ चा विस्तार चिखली रेल्वे स्थानकापर्यंत केल्याने नागरिकांना एकाच ठिकाणाहून मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे लवकरच चिखलोली रेल्वे स्थानक हे महत्वाचे ट्रान्सपोर्ट हब होणार आहे.


“बदलापूर आणि अंबरनाथमधून मुंबई आणि ठाणे येथे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यामुळे स्थानकांवर प्रचंड गर्दी होत आहे. चिखलोली रेल्वे स्थानक आणि मेट्रो सेवेमुळे हा ताण कमी होईल. यामुळे प्रवास सुलभ आणि जलद होईल,” असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Kalyan News : कल्याणच्या भटाळे तलावाच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी; नरेंद्र पवारांनी दिले निवेदन

कल्याण : कल्याण शहराच्या (Kalyan) ऐतिहासिक वारशाचा (Heritage) महत्त्वाचा भाग असलेल्या भटाळे तलावाच्या (Bhatale Lake) पुनरुज्जीवन

Mira Road Accident : मिरा रोडमध्ये बांधकाम साईटवर मोठा अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन थेट खाली, अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई : मिरा रोड (Mira Road) येथील जेपी नॉर्थ (JP North) कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी सायंकाळी बांधकाम साईटवर (Construction Site) भीषण

Eknath Shinde : 'कच्छी समाजाशी नातं हे कुटुंबासारखंच'; ठाण्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कच्छी अस्मिता मंचतर्फे आयोजित 'कच्छी पगडी कोणशिरे' या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)