
उघड्यावर शौचाला जाण्याची वेळ
कल्याण : कल्याण, डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याचा गवागवा केला जात असला तरी मोहने येथील लहुजी नगर झोपडपट्टी वासियांना शौचालय सुविधा अभावी उघड्यावर प्रातर्विधी उरकावा लागत असल्याने शासनाच्या हागणदारी मुक्त अभियनाला मनपा क्षेत्रात हरताळ बसल्याचे दिसते.
मोहने येथील लहुजी नगर झोपडपट्टी वजा वसाहतीमध्ये दोन हजारहून अधिक नागरिकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे उघड्यावर शौच करावयास जावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि घर शौचालय योजनेचा गाजावाजा करणाऱ्या सरकारच्या दाव्यांना लहुजी नगरमधील वस्तुस्थितीने चपराक दिली आहे. कडोंमपाच्या हद्दीत मोहन्यातील लहुजीनगर मधील तब्बल २,५०० नागरिकांचा संभाव्य आरोग्याचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही कल्याण डोंबिवली सारख्या स्मार्ट शहरात उघड्यावर शौचाला जाण्यास नागरिक मजबूर आहेत. विशेषतः महिला वर्गाची यामुळे होणारी कुचंबणा आणि मानसिक त्रास ही आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब ठरत आहे. लहुजी नगर मधील पूर्वीच्या जुन्या शौचालयाची पडझड झाल्याने ते तोडण्यात आले. त्या जागी नवीन शौचालय बांधणे गरजेचे होते. परंतु शौचलय बांधण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, यापूर्वी सुलभ शौचालय दुमजली बांधण्याचे काम इमारत बांधून देखील न्यायालयीन वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने अद्याप देखील सुरू होऊ शकले नाही.
लहुजी नगर मधील करदाते नागरिक मनपाला मालमत्ता कर भरतात, त्यांच्या मुलभूत सुविधा पुरविणे मनपाचे काम आहे. कोणच्या दबावामुळे नागरी सोयी सुविधाचा बोजावारा होत आहे, असाही आरोप यानिमित्ताने होत आहे. याबाबत माजी नगरसेवक दया शेट्टी यांनी खासदार सुरेश बाळ मामा म्हात्रे यांची भेट घेतली असून लहुजी नगरच्या शौचालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी विनंती केली आहे. नागरिकांना साधे शौचालय उपलब्ध नसणे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे असे दया शेट्टी यांनी सांगितले.