शिलाँग पोलिसांनी केला खळबळजनक खुलासा
इंदूरच्या वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी हत्याकांड संदर्भात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. हनिमूनच्या बहाण्याने आपल्या पतीला (Raja Raghuvanshi) मेघालय येथे घेऊन जाऊन, प्रियकर आणि सुपारी किलर्सच्या मदतीने त्याची हत्या करणारी सोनम रघुवंशीने पोलिसांच्या तावडीतून आणि या हत्याकांडातून सुखरूप सुटण्यासाठी एक धूर्त कट रचल्याची महिती समोर आली आहे. ज्यामध्ये सोनम स्वतःला मृत घोषित करून, भूमीगत होण्याच्या प्रयत्नांत होती. त्यासाठी,राजा रघुवंशीच्या मारेकऱ्यांनी एका महिलेला मारून तिचा मृतदेह जाळण्याची योजना आखली होती, जेणेकरून ते सोनमचे शरीर म्हणता येईल आणि सत्य बाहेर येईपर्यंत ते लपून राहील.
पोलिस तपासणीद्वारे सर्वांनाच कळले आहे की सोनमचा प्रियकर राज कुशवाहा या हत्याकांडाचा कटाचा प्रमुख सूत्रधार होता आणि सोनमने त्याला सहमती दर्शवली होती. पण सोनमबद्दल मेघालय पोलिसांनी एक मोठा दावा केला आहे. ज्याद्वारे सोनमचा धूर्त हेतू समोर जगासमोर आला आहे.
दुसऱ्या महिलेला मारून स्वतःला मृत घोषित करणार होती सोनम
मेघालय पोलिसांनी असा दावा केला आहे की सोनम दुसऱ्या महिलेला मारून तिचा मृतदेह स्वतःचा म्हणून देण्याचा आणि कायमचा गायब होण्याचा कट रचत होती. शिलाँगच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, इंदूरमधील वाहतूक व्यवसायिक राजा रघुवंशी यांच्या मारेकऱ्यांनी एका महिलेला मारून तिचा मृतदेह सोनमचा मृतदेह म्हणून दाखवण्यासाठी जाळण्याची आणि सत्य उघड होईपर्यंत ते लपविण्याची योजना आखली होती.
पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे एसपी विवेक सायम म्हणाले की, राजाला मारण्याचा कट ११ मे रोजी त्यांच्या लग्नापूर्वी इंदूरमध्ये रचण्यात आला होता. राजा (२९) आणि सोनम (२४) २३ मे रोजी सोहरा येथे बेपत्ता झाले होते. राजाचा मृतदेह २ जून रोजी वेसाडोंग फॉल्सजवळील एका नाल्यात सापडला, तर सोनमने ९ जून रोजी गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले. पोलिसांनी राज कुशवाह आणि इतर तिघांनाही अटक केली, जे राजचे मित्र होते, त्यापैकी एक त्याचा चुलत भाऊ होता. एसपी म्हणाले की ही कॉन्ट्रॅक्ट किलिंग नव्हती. मैत्रीतून राजला मदत करणाऱ्या तिघांनीही मदत केली. खर्चासाठी राजने ५०,००० रुपये दिले होते.
हत्येनंतरचा प्लॅन बी
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारीमध्ये इंदूरमध्ये कट रचण्यास सुरुवात झाली. पहिली योजना सोनमला नदीत बुडत असल्याचे भासवणे, दुसरी योजना एका महिलेला मारून मृतदेह जाळून सोनमचा मृतदेह म्हणून देणे. दोन्ही योजना अयशस्वी झाल्या. आरोपींनी प्रथम गुवाहाटीत हत्येची योजना आखली, परंतु नंतर सोनमने सोहराला जाण्याचा प्लॅन केला. २३ मे रोजी दुपारी २:०० ते २:१८ दरम्यान वेसाडोंग फॉल्स येथे नोंगरियात भेटल्यानंतर, तिघांनी आसाममधून खरेदी केलेल्या 'दाओ' (धारदार शस्त्र) ने राजाला ठार मारले आणि मृतदेह खंदकात फेकून दिला. सोनम घटनास्थळी उपस्थित होती आणि तिने आकाशला रक्ताने माखलेला रेनकोट दिला, जो नंतर फेकून देण्यात आला. बुरखा घातलेली सोनम टॅक्सीने गुवाहाटी, नंतर बस आणि ट्रेनने सिलीगुडी (पश्चिम बंगाल), पाटणा, आरा, लखनऊ आणि नंतर इंदूर येथे पोहोचली. एका टूर गाईडने सांगितले की त्याने सोनम-राजा यांना तीन पुरूषांसह पाहिले. अशा प्रकारे पोलिसांना सुगावा लागला. राजने सोनमला इंदूर सोडून सिलीगुडीला जाऊन अपहरण झाल्याचे नाटक करण्यास सांगितले. परंतु ८ जून रोजी आकाशच्या अटकेनंतर राज घाबरला आणि सोनमने गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले. पोलिसांनी रेनकोट आणि स्कूटी जप्त केली. एसपी श्याम म्हणाले, "आम्ही जबाब नोंदवत आहोत, चौकशी सुरू आहे आणि आम्ही ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करू."