
शंतनू चिंचाळकर
अठराव्या टाटा आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूरु संघाने पंजाब किंग्ज संघावर सनसनाटी विजय मिळवून करंडक जिंकला. दोन्ही संघांनी आजवर आयपीएल चषक जिंकला नसल्यामुळे विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. गुजरातचा संघ अंतिम सामन्यात नसल्याने उत्कृष्ट खेळासाठी स्टेडियममधील दर्शकांचा दोन्ही संघांना पाठिंबा मिळाला, मात्र विराट कोहलीचे वलय आणि खेळी निर्णायक ठरली.
तमाम भारतीयच नव्हे तर ५० कोटींहून अधिक विश्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या अठराव्या टाटा आयपीएल-२०२५ स्पर्धेच्या ३ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या टी-२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूरु संघाने पंजाब किंग्ज संघावर सनसनाटी विजय मिळवून करंडक जिंकला. आजवर या मैदानावर झालेल्या तिसऱ्या अंतिम आणि अतिशय रोमहर्षक सामन्यात आयपीएल चषक जिंकण्याचे पंजाब किंग्ज संघाचे स्वप्न अधुरे राहिले. या दोन्ही संघांनी आजवर झालेल्या कोणत्याही आयपीएल स्पर्धेचा चषक जिंकला नव्हता. त्यामुळे दोन्ही संघांनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. गुजरातचा संघ अंतिम सामन्यात नसल्याने उत्कृष्ट खेळासाठी स्टेडियममधील दर्शकांचा दोन्ही संघांना पाठिंबा असणार हे निश्चित होते. नरेंद्र मोदी स्टेडियमवर जमलेल्या हजारो दर्शकांना ज्याची धाकधुक लागून राहिली होती, त्या पावसाने सामन्यादरम्यान व्यत्यय आणला नाही, हे विशेष म्हणावे लागेल. फलंदाजीला अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देईल हे निश्चित होते. यापूर्वी खेळल्या गेलेल्या आठ लढतींमध्ये २०० धावांचा टप्पा ओलांडला गेला, त्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी सहा वेळा विजय प्राप्त केला; परंतु बंगळूरु संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकूनही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा आश्चर्यजनक निर्णय घेतला.
९ एप्रिलला सुरू झालेल्या या स्पर्धेचे सामने भारताच्या सहा प्रमुख शहरांमध्ये खेळले गेले. आयपीएल स्पर्धेत बंगळूरु संघ आजवर २००९, २०११, २०१६ आणि २०२५ अशा चार वेळा अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता, तर पंजाबचा संघ २०१४ आणि आता २०२५ मध्ये अंतिम सामना खेळत होता. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अंतिम सामना खेळणाऱ्या दोन संघांमध्ये आजवर खेळल्या गेलेल्या ३६ सामन्यांपैकी दोघांनी प्रत्येकी १८ सामने जिंकले होते. यावरून अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे निश्चित होते. दोन्ही संघांनी प्रत्येकी १४ साखळी सामने खेळून नऊ सामन्यांमध्ये १९ गुणांसह विजय मिळवला, तर चार सामने गमावले. या दोन संघांच्या रन रेटमध्ये .+०७१ इतकाच फरक होता. ही या अंतिम सामन्याची चुरस दाखवणारी वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. अखेर बंगळूरु संघाने १८ वर्षांचा विजयाचा दुष्काळ संपवत करंडक पटकावला. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान बंगळूरु संघाचा कर्णधार रजत पाटीदार महत्त्वाचे निर्णय घेताना विराट कोहलीशी सतत सल्लामसलत करत होता. त्यामुळे या स्पर्धेच्या विजेतेपदाचे श्रेय कोहलीलाही जाते.
तुलनेने तुल्यबळ वाटणारे पंजाब आणि बंगळूरु हे दोन्ही संघ यंदाच्या मोसमात तीन वेळा आमने-सामने आले. यात बंगळूरुने दोन वेळा बाजी मारली होती. क्वालिफायर-१ लढतीमध्ये पंजाबने केवळ १०१ धावांचे आव्हान बंगळूरुसमोर ठेवत सपशेल शरणागती पत्करली. हा सामना हरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला होता की, फलंदाजीतील अपयशामुळे झालेल्या पराभवावर जास्त चर्चा न करता मी फलंदाजांना आपला नैसर्गिक खेळ खेळण्याचा सल्ला दिला आहे. नवोदित खेळाडूंवर दडपण आणून त्यांना त्यांच्या आक्रमक खेळापासून दूर ठेवणे मी उचित मानत नाही. बंगळूरुचा संघ पहिल्या प्ले ऑफमध्ये पंजाबला सहज धूळ चारून थेट अंतिम फेरीत पोहोचला असला तरी मुंबईसारख्या बलाढ्य संघाला पंजाबने पराभवाचा कडवा डोस पाजला, हे अंतिम सामना खेळताना बंगळूरुच्या संघाला विसरून चालणार नव्हते. पण विजयाची प्रेरणा त्यांना अंतिम विजय प्राप्त करण्यास उपयोगी पडली असे म्हणावे लागेल.
या स्पर्धेत बंगळूरु संघाच्या फलंदाजीची मदार सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विराट कोहली आणि फील सॉल्ट यांच्यावर तर पंजाब संघाची मदार श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग यांच्यावर होती. खासकरून मुंबईविरुद्धच्या सामन्यात अश्विनीकुमारने टाकलेल्या १९ व्या षटकात श्रेयस अय्यरने चार षटकार ठोकले होते. त्याने नाबाद राहात ८७ धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याच्याकडून तशाच फलंदाजीची अपेक्षा होती. गोलंदाजीत सातत्याने यश मिळवणाऱ्या अर्शदीप सिंग आणि मार्को यान्सेन यांच्यावर पंजाबची तर जोश हेझलवूड आणि कुणाल पंड्या या खेळाडूंवर बंगळूरुची दारोमदार होती. तुलनात्मक अभ्यास करता बंगळूरु संघाला ही स्पर्धा जिंकण्याची जास्त संधी होती. २० षटकांच्या सामन्यांमध्ये, फलंदाजी आणि गोलंदाजीचा समन्वय आणि त्याला क्षेत्ररक्षणाची मिळालेली साथ हे हमखास यशाचे ठरणारे गणित बंगळूरु संघाने या अंतिम सामन्यातही खरे करून दाखवले.
‘क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स’ या म्हणीची संपूर्ण स्पर्धेत जाणवलेली प्रचिती अंतिम सामन्यातही जाणवली. फलंदाजीला पोषक अशी खेळपट्टी असल्याने पहिल्या पाच-सहा षटकांमध्ये जास्त धावा करणाऱ्या संघाला जिंकण्याची संधी जास्त असेल, असे तज्ज्ञांचे मत होते. स्पर्धेमध्ये बंगळूरुच्या विराट कोहली आणि फिल सॉल्ट या सलामीवीरांकडून केली गेलेली आकर्षक फटकेबाजी अंतिम सामन्यातही अपेक्षित होती. परंतु तिसऱ्याच चेंडूवर सनसनाटी षटकार ओढत धडाकेबाज खेळाची सुरुवात करणारा सॉल्ट दुसऱ्या षटकातही एक षटकार ओढून झेलबाद झाला. त्याच्या जागी आलेला मयंक अगरवालही कोहलीची साथ न देता लवकर परतला. त्यानंतर आलेल्या कर्णधार पाटीदार आणि कोहलीने सावध खेळ करत धावफलक हलता ठेवला. संघाच्या ९३ धावा फलकावर लागल्या असताना कर्णधार पाटीदार यॉर्करवर पायचीत झाला. मधल्या फळीतील फलंदाजांच्या साथीने कोहलीने संयमी खेळ करत अकराव्या षटकात संघाच्या १०० धावा फलकावर लावल्या. चौदाव्या षटकात संघाची धावसंख्या १३१ असताना दुर्दैवाने तो बाद झाला. त्यानंतर कमी षटके राहिल्याने धावफलक हलता ठेवण्याच्या नादात ठरावीक अंतराने बंगळूरु संघाचे बळी जात राहिले आणि त्यांचा डाव १९० धावांवर आटोपला. प्रभसीमरनच्या साथीने पंजाबच्या डावाची सुरुवात करणाऱ्या प्रियांश आर्याने पहिलाच चेंडू सीमापार धाडत धडाकेबाज सुरुवात केली. दोघांनी भुवनेश्वरकुमारच्या पहिल्याच षटकात १३ धावा वसूल केल्या. तिसऱ्या षटकात प्रभसीमरनचा झेल सोडून शेपर्डने जीवदान दिले. संघाच्या ४३ धावा फलकावर लागल्या असताना प्रियांश आर्य वैयक्तिक २४ धावांवर बाद झाला. त्याच्या जागी आलेल्या जॉर्ज इंग्लिसने आकर्षक टोलेबाजीचे प्रदर्शन घडवले, पण दुसरीकडे नवव्या षटकात संघाची धावसंख्या ७२ असताना प्रभसिमरन बाद झाला. ज्याच्याकडून पंजाब संघाला धडाकेबाज खेळाची अपेक्षा होती, तो श्रेयस अय्यर दहाव्या षटकात स्वस्तात परतला. त्यावेळी बंगळूरु संघाच्या खेळाडूंनी मैदानात सामना जिंकल्यासारखा आनंद व्यक्त केला. तेराव्या षटकात जॉर्ज इंग्लिस बाद झाल्यावर संघापुढे जिंकण्यासाठी षटकाला १३ धावांची गती ठेवण्याचे आव्हान होते. पण शशांक सिंग आणि नेहल वढेरा यांच्या आक्रमक फलंदाजीने सामन्यात फारशी रंगत टिकवून ठेवली नाही आणि जिंकण्यासाठी २९ धावांची आवश्यकता असलेल्या शेवटच्या षटकापर्यंत उत्सुकता वाढवत गेलेला सामना अखेर रॉयल चॅलेंजर बंगळूरु संघाने जिंकत १८ वर्षांनी विजयी चषकाला गवसणी घातली.
सामन्यातील विजयानंतर, आजवर बंगळूरु संघाकडून सलग १८ वर्षे खेळूनही विजयी चषक हाती न लागलेल्या विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर झाले. विराटच्या संघातील प्रत्येक खेळाडू त्याला २०२५ चा चषक मिळवून द्यायचाच, असा पण करून मैदानात उतरला होता. त्यांच्या प्रयत्नांचे सार्थक झाले असेच म्हणावे लागेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या दर्शकांचा केवळ विराट कोहलीमुळे रॉयल चॅलेंजर बंगळूरु संघाला पाठिंबा होता, हे सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून जाणवत होते. हीच एका महान खेळाडूची दिसून येणारी जिद्द आणि सातत्यपूर्ण खेळ बंगळूरु संघाच्या विजेतेपदाला कारणीभूत ठरला, असे म्हटले तर वावगे ठरू नये.