मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा १४ जून हा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणे राज्यभरातून मनसैनिक या दिवशी मुंबईतील शिवतीर्थावर येऊन त्यांना शुभेच्छा देतात. मात्र यंदा ही परंपरा खंडित होणार आहे. राज ठाकरे यांनी स्वतः पत्राद्वारे मनसैनिकांना यावर्षी शिवतीर्थावर न येण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबईबाहेर जाणार असल्याचे स्पष्टीकरण
या वर्षी १४ जून रोजी म्हणजेच वाढदिवसाच्या दिवशी ते सहकुटुंब मुंबईबाहेर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. “मी वाढदिवस साजरा करणार नाहीये, किंवा काही विशेष कारण आहे असेही नाही. त्यामुळे कोणतेही वेगळे अर्थ काढू नयेत,” असेही त्यांनी नमूद केले आहे.
“तुमच्या भेटीला लवकरच येईन”
राज ठाकरे यांनी आपल्या भावनिक पत्रात पुढे लिहिलं आहे की, “गेली अनेक वर्षं तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी भेटायला याल, हे निश्चित असतं. प्रत्येकाच्या भेटीचं, शुभेच्छांचं आणि प्रेमाचं मी ऋण मानतो. यंदा तुमचं दर्शन घडणार नाही, याची खंत राहील. पण मी लवकरच तुम्हाला भेटायला येईन. महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी पुन्हा भेट निश्चित आहे.”
पुण्यात स्मार्ट ई-बसेसचे सादरीकरण पुणे: एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता एआय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई- बसेस ...
‘लोकोपयोगी कार्य करा’
राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या दिवशी आपल्या भागात लोकोपयोगी कार्यक्रम राबवण्याचं आवाहन केलं आहे. “तुमच्या भागात सामाजिक उपक्रम राबवले, तर तेच माझ्या वाढदिवसाचं खऱ्या अर्थाने औचित्य ठरेल,” असं ते म्हणाले.
“तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण करा. आपण लवकरच भेटू,” असा सकारात्मक संदेश देत त्यांनी पत्राचा शेवट केला आहे. राज ठाकरे यांचं हे आवाहन एका जबाबदार नेत्यानं आपल्या कार्यकर्त्यांप्रती असलेल्या आत्मीयतेचं आणि संवेदनशीलतेचं उदाहरण ठरतं.