Thursday, June 12, 2025

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सोयी-सुविधांचा अभाव

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सोयी-सुविधांचा अभाव

कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे ग्राहक विक्रेते हैराण


कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात पसरलेले कचऱ्याचे ढिगारे आणि काही भागातील चिखलमय रस्ता पाहता तसेच कचऱ्याच्या सुटलेल्या दुर्गंधीमुळे फुलभाज्या, फळ भाज्या, तसेच फळे-फुले खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना डंपिंग ग्राऊंडवर आल्याचा भास होत आहे.


कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दररोज साधरण लहान मोठ्या सुमारे १०० हून अधिक गाड्यांमधून शेतकरी मालाची आवक होते. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सोयी-सुविधांचा अभाव पाहता शेतकरी शेडमधील तरकारी घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना चिखल युक्त रस्त्यातून मार्ग काढीत खरेदी करावी लागत आहे. फुल मार्केटचे केडीएमसी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे भिजत घोंगडे कायम असून तोडलेल्या फुल मार्केट समोर तात्पुरती शेड उभारून त्यातच फुल मार्केट सुरू आहे. फुल मार्केट लगतच्या रोडलगत कुजलेल्या फुलांच्या कचऱ्यांचे ढिगारे पाहता, कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील अस्वच्छता ही संभाव्य रोगराईला कारणीभूत ठरू शकते.


याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय ऐडगे यांनी सांगितले की, संदर्भीत कचरा उचलण्यासाठी प्रतिमाह साडे आठ लक्ष रू. ठेकेदाराला देत असून तो कचरा शहराबाहेर त्यांच्या खासगी जागेत डंपरने नेतो. बाजार समिती केडीएमसीला सुमारे ७० लक्ष कर भरते. तसेच गाळेधारक देखील मनपाला टॅक्स भरतात. पंरतु कचरा, दिवाबत्ती आदी सुविधांबाबत मनपा काही एक करीत नाही. फक्त टॅक्स घेते तर केडीएमसीच्या अख्यारितील फुल मार्केटचा कचरा देखील आम्हीच उचलतो.


कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर सद्यस्थितीत प्रशासकीय राजवट असून, २९ जून रोजी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणूका होत आहेत. याकडे राजकीय क्षेत्रातील दिग्गाजांचे लक्ष असून, आजी, माजी संचालक देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून कृषी उत्पन्न बाजार समितीतील अस्वच्छता, सोयी-सुविधांचा अभाव, कचऱ्याचे ढिगारे हा मुद्दा देखील यानिमित्ताने प्रचाराचा मुद्दा बनल्याचे दिसून आले आहे.


याबाबत केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले की, बाजार समिती आवारात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम असून कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कचऱ्यामुळे, अस्वच्छेतेमुळे संभाव्य नागरी आरोग्य प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत सूचना करणार आहे. एकीकडे मनपा क्षेत्रातील वाढीव शुल्क कमी होण्यासाठी राजकीय पक्षांचा एल्गार सुरू असताना केडीएमसी क्षेत्रातून बाजार समितीची कचरा वाहतूक होत आहे. ती शास्त्रीय मापदंडानुसार होते की नाही, हे पाहत कचरा वाहतूक शुल्क आकारणी मनपा का करीत नाही? असा सवाल जाणकारांकडून यानिमित्ताने होत आहे.

Comments
Add Comment