दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरू करा

शिवसेना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी


लोकल १५ डब्ब्यांमध्ये परावर्तित करणे 


पाचवी, सहावी मार्गिका ‘सीएसएमटी’ पर्यंत लवकर कार्यान्वित करा 


कल्याण-कर्जत परिसरात लोकल सेवा वाढवणे 


ठाणे : लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून खासदार डॉ. शिंदे यांनी याप्रसंगी शोक व्यक्त केला. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, या अपघातातील १० जणांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या दोघांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे. सात जखमी रुग्णांवरील धोका टळला असून या अपघातात आतापर्यंत एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. मुंब्रा स्टेशनजवळ एक वळण आहे. तिथे अप लोकल आणि डाऊन लोकल जात असताना दोन्ही लोकलमधील काहीजण खाली पडले तर काहीजण ट्रेनच्या आतमध्ये पडले, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.



खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, कल्याण-कर्जत परिसरात मोठ्या संख्येने नागरिक राहतात. त्यामुळे या मार्गावर लोकल फेऱ्या वाढवणे आवश्यक आहे. प्रवासी संघटनांकडून लोकल संख्या वाढवण्याची वारंवार मागणी केली जाते. ठाणे-कल्याण पाचवी आणि सहावी मार्गिका सुरु झाल्यानंतर लोकल फेऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली, मात्र पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तार होणे आवश्यक आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाचे काम सुरु आहे. हे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा लोकल फेऱ्यांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. कल्याणच्या पुढे तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्याचे काम सुरु असून यासाठी जमीन अधिग्रहण केले जात आहे. लोकल फेऱ्या जेव्हा वाढतील तेव्हा गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे जाईल. नव्या मार्गिका वाढवण्याबरोबरच १२ डब्ब्यांच्या लोकल १५ डब्ब्यांमध्ये परावर्तित करणे तितकेच गरजेचे आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. रेल्वे प्रवाशांची दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी आहे, या मागणीचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले. पूर्वी दिवा येथे जलद लोकलला थांबा नव्हता, मात्र आता दिवा येथे जलद लोकल थांबतात, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.




“मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूने उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या मुद्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखीत झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावले उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून दिवंगत प्रवाशांना दु:खद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्य रेल्वेवर कोपर ते दिवा स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करुन दिवंगत प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे. - उपमुख्यमंत्री अजित पवार


मुंब्रा स्थानकावर घडलेली रेल्वे दुर्घटना ही अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी आहे. अनेक निष्पाप प्रवाशांचा जीव गमावणे ही गोष्ट कोणत्याही संवेदनशील समाजासाठी असह्य आहे. जर भारतीय रेल्वेने सोशल मीडियावरील रील्सपेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले असते, तर हे कधीच घडले नसते. मी शासनाकडे आणि रेल्वे प्रशासनाकडे या घटनेची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करतो. जेणेकरून संपूर्ण सत्य जनतेसमोर येईल आणि जबाबदारी निश्चित होईल.
- प्रकाश आंबेडकर
(अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)


लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचे उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.
- शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष )


Comments
Add Comment

Thane : राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

ठाणे : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

Thane News : कासारवडवलीतील ७८० मीटर डीपी रस्त्याचा मार्ग मोकळा होणार; अण्णा बनसोडेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

ठाणे : ठाण्यातील कासारवडवली-मोगरपाडा परिसरातील ७८० मीटर लांबीच्या डीपी रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांशी चर्चा

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक

Eknath Shinde : गणेशोत्सवाआधी खड्डे बुजवा! मनपांना उपमुख्यमंत्र्यांचे आदेश; उत्कृष्ट काम करणाऱ्या पालिकेला बक्षीस

खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांना कामाला लागण्याचे निर्देश पावसाळ्यात तातडीने

Mira Road : स्कूल व्हॅन रस्त्यावरून जात असताना मेट्रोचा स्लॅब कोसळला, आणि...

मिरा रोड : मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मेट्रोशी संबंधित कामं प्रगतीपथावर आहेत. मेट्रोच्या कामांमुळे काही

Dombivli Local Train Accident : डोंबिवली लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू; पोस्टमार्टेम रिपोर्टने तपासाला नवे वळण

डोंबिवली : डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर