मुंबई: दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान धावत्या लोकलच्या गाडीतून ८ ते १२ प्रवासी रेल्वे रुळावर पडल्याची धक्कादायक घटना (Mumbai Local Train Accident) आज सकाळी घडली. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये खूप गर्दी होती आणि अनेक प्रवासी दारांवर लटकून प्रवास करत होते. यातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर अनेकजण जखमी झाले, ज्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता या प्रकरणावर राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. ज्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Mns Leader Raj Thackeray) यांनी देखील मुंबईच्या लोकलमधील वाढत चाललेली गर्दी आणि त्यावर आपला संताप व्यक्त केला आहे.
मुंब्रा रेल्वे दुर्घटना (Mumbra Local Train Accident) अत्यंत दुर्दैवी असल्याचे राज ठाकरे म्हणाले, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. पण याबरोबरच सातत्याने वाढत चाललेल्या या अपघाताबद्दल संतापही व्यक्त केला. "मुंबईच्या रेल्वेमध्ये असे अपघात सातत्याने घडत आहेत. हा विषय केवळ रेल्वेपुरता मर्यादित नाही. आपल्या शहरांचा विचका झाला आहे. टाऊन प्लॅनिंग नावाची आपल्याकडे गोष्टच नाहीये. रेल्वे, ट्राफिकचा बोजवारा उडालेला आहे. कोण येतंय, कोण जातंय हे कळतच नाहीये. रस्ते नसल्याने पार्किंग नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे.” असे राज ठाकरे म्हणाले.
परकीय लोंढयांमुळे रेल्वे सेवा कोलमडली
मुंब्रा रेल्वे दुर्घटनाबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, “बाहेरून येणाऱ्या लोंढयांमुळे रेल्वे सेवा कोलमडली. केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. सगळे निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. मोनो, मेट्रोमुळे हे प्रश्न सुटणार नाहीत. राज आणि उद्धव एकत्र येण्यापेक्षा या समस्या हट्ट्याच्या बातम्या दाखवा. मुंब्रा येथील धोकादायक वळण सर्वाना माहिती, ते काही नवीन नाहीये. मुंबईत संध्याकाळी घुसून दाखवा.”
टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही
मुंबईत वाढत चाललेल्या गर्दीबद्दल बोलताना राज ठाकरे पुढे म्हणाले, "आपल्याकडे टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाहीय. आपल्याकडे बाहेरून येणारे लोंढे आहेत यामुळेच रेल्वे कोलमडली आहे. रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, ट्राफिकचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाहीत. वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय कोण जातंय तुम्हाला माहिती नाही," पुढे राज ठाकरे असेही म्हणाले, मुंबईत मेट्रो, मोनो सर्व आहे. पण गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबलंय का? टू व्हीलर, फोर व्हिलरचे रजिस्ट्रेशन थांबलंय का, त्या गाड्या येतात आहेत. नक्की मेट्रो कोण वापरतंय, मोनो कोण वापरतंय, कोणी पाहायला तयार नाही. सर्वजण फक्त निवडणुका, प्रचार यातच गुंतले असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली. इतकंच नाहीतर गेले अनेक दिवस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार याच्या जितक्या बातम्या लावल्यात, तेवढ्या तुम्ही रेल्वे अपघातात जीव गेलेल्यांच्या बातम्या लावणार आहात का? असा सवालही राज ठाकरेंनी पत्रकारांना केला.