
कथा : प्रा. देवबा पाटील
आदित्यची त्याच्यासारख्याच एका हुशार पण गरीब मुलासोबत आता चांगली ओळख झाली होती. तो मुलगा रोज शाळेच्या मधल्या सुट्टीत आदित्यच्या मैत्री ग्रुपजवळ येऊन त्यांच्यापासून थोडा दूर बसू लागला. त्यांची आपापसात रोज सूर्याबद्दल चर्चा सुरू झाली होती.
“तुला तर बरीच माहिती दिसते दोस्ता. तुझे नाव काय मित्रा? तुला ही सगळी माहिती कोठून माहीत झाली? कोणत्या शाळेत व कोणत्या वर्गात शिकतोस तू?” आदित्यने त्याला आपुलकीने विचारणा केली.
“माझे नाव सुभाष आहे.” तो सांगू लागला, “मी आपल्याच शाळेत ९ व्या वर्गात शिकत आहे. तीन दिवसांपूर्वीच आपल्या शाळेच्या ग्रंथालयातून मी प्रा. देवबा शिवाजी पाटील यांचे “आकाशाचे गूढ” हे पुस्तक घरी नेले व त्याचदिवशी रात्री पूर्णपणे वाचून काढले. ते पुस्तक खूपच छान आहे आणि अत्यंत साध्या व सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना आकाशाचे ज्ञान मिळवण्यासाठी ते अतिशय उपयोगी आहे. त्या पुस्तकातून मला ही सारी माहिती मिळाली. ते पुस्तक मला खूप आवडले म्हणून मी ते दररोज रात्री वाचत असतो. तर असे कालपर्यंत चारपाचदा रात्री मी ते पुस्तक वाचले. मी त्रिपाठी आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट तीन वेळा वाचली वा तीन वेळा ऐकली की माझ्या पूर्णपणे जशीच्या तशी लक्षात राहते. तसे तर मी हे पुस्तक मला खूपच आवडल्यामुळे या दोन दिवसांमध्ये चारपाचदा वाचले. त्यामुळेच ही एवढी माहिती पूर्णपणे व जशीच्या तशी माझ्या लक्षात राहिली. तुम्ही म्हणाल तर सूर्याविषयी अजूनही बरीच काही माहिती मी तुम्हाला सांगू शकतो.”
“ सूर्यस्फोटाच्या वेळी आणखी काय काय निर्माण झाले?” मोंटूने प्रश्न केला.
“ त्याचवेळी काही खडक-दगडांच्या तुकड्यांच्या उल्का बनल्यात, तर काही खडक-दगडांच्या तुकड्यांपासून त्यासोबतच्या धुळीसह धुमकेतू बनलेत. उल्का, लघुग्रह नि धूमकेतू हे नेहमी सूर्याभोवती फिरत असतात; परंतु उपग्रह मात्र हे स्वत:भोवती फिरतात आणि त्याचवेळी ते स्वत:च्या ग्रहाभोवतीही फिरतात.” त्याने माहिती दिली.
“म्हणजे आपल्या सूर्यमालेत हे सगळेच आलेत तर?” चिंटू म्हणाला.
“हो. सारेच आलेत.” सुभाष म्हणाला, “ सूर्य व हे सगळे ग्रह, सर्व ग्रहांचे उपग्रह, धुमकेतू, उल्का व लघुग्रह असे सर्व मिळून सूर्यकूल अर्थात सूर्याचा परिवार म्हणजे सूर्याचे कुटुंब तयार झाले. सूर्याच्या या परिवारालाच सूर्यमाला किंवा सौरमाला असे म्हणतात. या आपल्या सूर्यमालेतील नऊ ग्रहांपैकी एक ग्रह म्हणजे आपली साऱ्यांची प्रिय पृथ्वी आहे हे तर आपणा सर्वांनाच माहीत आहे.”
“ सूर्याचे तुकडे झाले म्हणजे सूर्य आपल्या पृथ्वीपेक्षा खूपच मोठा असेल?” पिंटूने शंका काढली.
“हो.” सुभाष म्हणाला, “सूर्याचा आकार हा आपल्या पृथ्वीच्या आकारापेक्षा एक कोटी तेहतीस लक्ष पट मोठा आहे.”
“ ते सगळे जर सूर्याचेच तुकडे आहेत तर मग त्यांना ग्रह, उपग्रह अशी वेगवेगळी नावे कशी काय आहेत?” पिंटूने प्रश्न केला.
“वैज्ञानिकांनी त्यांच्या अभ्यासाअंती ठरविल्यानुसार सूर्याभोवती फिरणाऱ्या मोठ्या आकाराच्या गोलांना ग्रह म्हणतात, तर ग्रहाभोवती फिरणाऱ्या त्यापेक्षा लहान आकाराच्या गोलांना उपग्रह किंवा चंद्र म्हणतात. सूर्याभोवती फिरणाऱ्या अनेक छोट्या छोट्या खडक-दगडांच्या तुकड्यांना लघुग्रह म्हणतात.” सुभाषने उत्तर दिले.
“बरे, आपल्याला सूर्य चालताना कसा दिसतो?” बंटूने प्रश्न केला. “सूर्य हा चालतच नाही मुळी. तो पृथ्वीसापेक्ष स्थिरच असतो. उलट पृथ्वीच त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालत असते म्हणजे पृथ्वी हीच चालत असते; परंतु आपण पृथ्वीवर राहत आहोत म्हणून आपल्याला पृथ्वी ही स्थिर आणि सूर्य हा ठरावीक मार्गावरून चालताना भासतो. सूर्याच्या या भासमान मार्गाला क्रांतिवृत्त म्हणतात.” सुभाष म्हणाला.
नेहमीसारखी शाळेची घंटी झाली व त्यांची मधली सुट्टी संपली. त्यांना आपल्या चर्चेला थांबवून आपापल्या वर्गाकडे जावे लागले.