Sunday, June 8, 2025

Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस

Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी: भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी वेळापत्रकात बदल जाहीर केला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी हे बदल १५ जून २०२५ ते २० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लागू राहणार आहेत. या कालावधीत ही गाडी सध्याच्या सहाऐवजी तीनच दिवस धावणार आहे.


कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १५ जूनपासून लागू होत असले तरी पावसाळी वेळापत्रकातील डाऊन वंदे भारत एक्स्प्रेसचीची फेरी १६ जून रोजी होणार असल्याने या दिवसापासून वंदे भारत एक्स्प्रेसला हा बदल लागू असेल.


मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस (22229) मान्सून वेळापत्रक असे : मान्सून काळात ही गाडी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. सकाळी ५:२५ वाजता गाऊ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. दादर (सकाळी ०५:३४), ठाणे (सकाळी ०५:५४), पनवेल (०६:२७), खेड ( ०८:२६), रत्नागिरी (०९:५०), कणकवली (११:१२), थिवी (दुपारी १२:१८) येथे थांबून ही गाडी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी मडगाव येथे पोहोचेल. प्रस्थान मान्सून काळात प्रवासाचा वेळ साधारणतः १० तास ५ मिनिटे असेल.


परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी मडगाव येथून सुटेल. गाडी रत्नागिरीतून सायंकाळी पाच वाजता रवाना होईल. खेड येथे ते सायंकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे रात्री १० वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट (www.enquiry.indianrail.gov.in) किंवा NTES ॲपवर अद्ययावत वेळापत्रक तपासावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment