रायगड जिल्ह्यातील जुने पूल होणार इतिहासजमा

ब्रिटीशकालीन पूल, धोकादायक बांधकामे होणार जमीनदोस्त


अलिबाग : अतिवृष्टीच्या काळात रायगड जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटत असल्याने त्यावर उपाय म्हणून अनेक लहान-मोठे पूल बांधून दळणवळण सुरळीत करण्याचा प्रयत्न ब्रिटिश राजवटीपासून करण्यात येत आहे; परंतु शंभर ते दीडशे वर्षांपूर्वी बांधलेले जिल्ह्यातील बहुतांश पूल आता नादुरुस्त आणि कमकुवत झाले आहेत. त्यामुळे इतिहासाची साक्ष असलेले हे पूल आता पाडण्यात
येत आहेत.


कोकणात पावसाळ्यातही दळणवळणास सोयीचे ठरावे यासाठी दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी बांधलेले पूल अद्याप वापरात आहेत, परंतु स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील १३३ पूल धोकादायक आढळले आहेत, तर राज्य शासनाच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारे ६८ जुने पूल दुरुस्तीही होऊ न शकणारे आहेत. काळ्या दगडाचे मजबूत बांधकाम असले, तरी आधुनिक अभियांत्रिकतेच्या निकषात ते नादुरुस्त ठरतात. यांतील बहुतांश पुलांची उंची जमिनीपासून कमी आहे. काहींना कठडे नाहीत. पूर्वीच्या वाहनांच्या संख्येनुसार त्यांची रुंदी तीन ते चार मीटर इतकी आहे. काही साकव त्याहूनही रुंदीने कमी आहेत. सध्याच्या वाहनांच्या रहदारीस ही जुनी व्यवस्था कमी पडत आहे. त्याचबरोबर अनेक वर्षे पुराचा मारा सहन केलेले हे पूल कमकुवत झाले आहेत. असे अनेक जीर्ण पूल जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळतात. भुंडा पूल दीडशे वर्षांपूर्वी भोगावती नदीवर बांधण्यात आला होता. या पुलाला कठडा नव्हता. त्यामुळे त्यास स्थानिक लोक भुंडा पूल म्हणून ओळखत. भुंडा पूल जमिनीपासून कमी उंचीवर होता. त्यास पर्याय म्हणून पेणचे आमदार रवींद्र पाटील यांच्या प्रयत्नाने नवा पूल बांधण्यात आलेला आहे. पर्याय उपलब्ध झाल्यानंतर जुना भुंडा पूल पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी हा पूल पाडण्यात आला.


दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असलेले रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १३३ पूल धोकादायक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यांपैकी कोणता पूल कधी पडेल याची शाश्वती उरलेली नाही. यात लहान नद्यांवरील साकव पुलांची संख्या जास्त आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने बांधलेल्या या पुलांची दुरवस्था झालेली आहे. या सर्व पुलांच्या दुरुस्तीसाठी ९८ कोटी ५० लाख रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे रायगड जिल्हा परिषदेकडून पाठविलेला असला, तरी अद्याप सरकारकडून या पुलांच्या दुरुस्तीसाठी निधीच न मिळाल्याने पुलांची कामे मार्गी लागू शकलेली नाहीत.


नागोठण्यातील शिवकालीन पूल नागोठण्याहून वरवठणे आणि रोह्याकडे जाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या अंबा नदीवरील शिवकालीन पुलाच्या कठड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शिवकालीन पुलाला अखेरची घरघर लागली असून, हा ऐतिहासिक ठेवा जपून ठेवण्यासाठी येथील ग्रामस्थांची धडपड सुरू आहे. हा पूल सुमारे ४५० ते ५०० वर्षांपूर्वीचा असून, आयपीसीएल (रिलायन्स) कंपनीच्या उभारणीच्या काळात नागोठण्यात अंबा नदीवर पर्यायी पूल उभारल्यानंतर या ऐतिहासिक पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. ऐतिहासिक ठेवा म्हणून हा पूल न पाडता पुलाची डागडुजी करावी, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे.


जुन्या बांधणीच्या पुलांची क्षमता संपलेली असल्याने त्यांचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. तरीही काही नागरिक त्याचा वापर करीत असतात. हे पूल कोसळून दुर्घटना होण्यापेक्षा त्यापूर्वीच ते पाडणे योग्य ठरेल.
- जगदीश सुखदवे, (कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग)

Comments
Add Comment

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी

१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या

अलिबाग पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-शेकाप लढत

१४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात अलिबाग : अलिबाग पंचायत समिती निवडणुकीसाठी १४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत.

राजिप, पंचायत समित्या निवडणुकीच्या तोंडावर पोलीस यंत्रणा सज्ज

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने

करंजाडी जिप गटात तिरंगी लढत

महाड ( वार्ताहर): महाड विधानसभा मतदारसंघ हा गेल्या ४ टर्म शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे. गतवेळच्या निवडणुकीत