नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
साहिर म्हणजे तरल शायरीचा हॉलमार्क! हळव्या, उत्कट भावना तळहातावर घेऊन तुमच्या मनाच्या ओंजळीत ओतणारी त्याची गाणी अजरामर आहेत. मनाचे किती नाजूक पदर तो आपल्याला सहज उलगडून दाखवायचा. त्याची गाणी ऐकल्यावर वाटते ‘अरे आपल्यालाही असेच वाटले होते’ किंवा ‘असे वाटणेच खरे तर किती योग्य होते. पण दुर्दैवाने आपण कधीच असा विचार केला नाही. अरेरे!’
साहिरसाहेबांचे एकेक गाणे एक कहर असायचे. गुमराहमधले महेंद्रकपूरने गायलेले ‘चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो’ किती वेगळ्या विषयावर होते! धूलका फुलमधले महेंद्रकपूर आणि लतादीदीने गायलेले ‘तेरे प्यारका आसरा चाहता हुं’, किती आर्जवी शब्द, रफी साहेबांनी गायलेले ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’, ताजमहलमधले त्यांचेच ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ किंवा ‘बरसात की रात’साठी त्यांनी दीदींबरोबर गायलेले ‘जिंदगीभर नहीं भूलेगी वो बरसात की रात’ कधीच जुने होणार नाही, हिंदी समजणारा शेवटचा रसिक शिल्लक आहे तोवर ही गाणी मनामनात जिवंत राहतील!
साहिरचे कोणत्याही मूडचे, कोणत्याही प्रसंगासाठी लिहिलेले, गाणे ऐका. मनात एकच विचार येतो - इतर गीतकारांपेक्षा किती वेगळ्या पद्धतीने याने हा विषय हाताळलाय! यार, ये आदमीकी बातही कुछ और हैं! आणि अगदी हेच शब्द असलेले एक गाणे त्याने लिहिले होते १९५९ साली आलेल्या ‘दीदी’साठी. सुधा मल्होत्रा यांनी मुकेशबरोबर गायलेले हे गाणे खास अभिरुचीच्या श्रोत्यांत अतिशय लोकप्रिय आहे. काही ना काही कारणांमुळे प्रेमकथा अर्धवट राहिलेल्या, एखादे नाजूक मन तोडावे लागलेल्या प्रत्येकाला आतून हलवणारे, पश्चातापाच्या अग्नीत ढकलणारे ते शब्द होते -
‘तुम मुझे भूल भी जाओ तो ये
हक है तुमको.
मेरी बात और है मैंने तो मुहब्बत की है.’
‘दीदी’ हा सदाशिव जे. राव कवी यांचा पहिला सिनेमा. यातली ‘दीदी’ होती व्ही. शांताराम यांची पहिली सुंदर पत्नी जयश्री. सोबत होते सुनील दत्त, शुभा खोटे, फिरोज खान, ललिता पवार, ओम प्रकाश, हनी इराणी, डेइसी इराणी. दिग्दर्शक होते के. नारायण काळे.
नावाप्रमाणेच कथा होती बहीणभावाच्या प्रेमाची. जयश्री ही सुनील दत्तची (गोपाल) प्रेमळ बहीण. त्याच्या काळजीपोटी त्याच्या आयुष्यातले निर्णय स्वत:च घेत असते. त्यातून निर्माण झालेल्या समस्या म्हणजे हा सिनेमा. शुभा खोटेने (राधा) सुनीलच्या प्रेयसीची भूमिका केली होती. कथेत बरेच चढउतार होत शेवट गोड होतो हा एक दिलासा!
मात्र एका टप्प्यावर नव्या पिढीला घडवण्यासाठी शिक्षक झालेला गोपाल दत्त आणि श्रीमंत वडिलांची कन्या असलेल्या राधाच्या प्रेमकथेचा अंत होत आलेला असतो. तेव्हा साहिरसाहेबांनी तिच्या तोंडी हे नितांत सुंदर गाणे दिले होते. लग्नाला नकार मिळाल्यावर प्रेयसी म्हणते आहे, आता माझ्या भावनांची, मनाची किंमतच काय म्हणा! हरकत नाही. मी तुझ्यावर मनापासून प्रेम केले आणि तुला कधी ते जाणवलेच नसेल तर काय उपयोग. ‘मी इतके जीवापाड प्रेम केले आणि तुला माझ्याबद्दल काहीच का वाटले नसावे’ हे मला पडलेले गुंतागुंतीचे प्रश्न अजिबातच महत्त्वाचे नाहीत. तू यावर काहीच बोलला नाहीस तरी हरकत नाही. उत्तर टाळण्याचा अधिकार तुला आहे. पण माझी गोष्ट वेगळी आहे. कारण मी मनापासून प्रेम केले.
अनेकदा अनेक प्रेमकथात ही परिस्थिती ओढवते. एक प्रेमात पूर्ण बुडालेला आणि दुसरा प्रेम उभयपक्षी असल्याचा समज तसाच ठेवत तटस्थपणे काठावर उभा! एखाद्या निरागस मनाचा केवढा स्वप्नभंग असतो तो! पण साहीरची प्रेयसी हे सगळे किती आगळ्या तऱ्हेने पचवते ते पाहणे मोठे लोभस होते. कवीने इथे एक आगळा संस्कारच पेरून ठेवला. आजच्या “एकतर्फी प्रेमातून हत्या” हे शीसर्षक असलेल्या असंख्य बातम्यांच्या पुरात साहिरने उभे केलेले हे आगळे शब्दशिल्प फार उठून दिसते.
‘मेरे दिल की मेरे जजबातकी
कीमत क्या है,
उलझे-उलझेसे खयालातकी
कीमत क्या है,
मैंने क्यूं प्यार किया तुमने न
क्यूं प्यार किया,
इन परेशान सवालातकी कीमत क्या है.
तुम जो ये भी न बताओ तो
ये हक है तुमको,
मेरी बात और है मैंने तो मुहब्बत की है.’
कथेत मात्र गोपाल मुदाम कठोर झालेला नसतो. तो आपली व्यथा मांडताना, राधाला समजावताना म्हणतो, ‘प्रिये, आयुष्य अनेक गोष्टींनी भरलेले असते. कधीकधी प्रेम हेच सर्वस्व मानता येत नाही. प्रेमापलीकडचे विदारक वास्तवही लक्षात घ्यावे लागते. माझ्या या कैफियतीकडे तू दुर्लक्ष केलेस आणि सगळा दोष मलाच दिलास तरी हरकत नाही. तुला तो अधिकार आहे; परंतु माझे जसे तुझ्यावर आहे तसे इतरांवरही आहे.
‘जिन्दगी सिर्फ मुहब्बत नहीं
कुछ और भी है,
जुल्फ-ओ- रुखसारकी जन्नत नहीं कुछ और भी है,
भूख और प्यासकी मारी हुई इस दुनियामें,
इश्कही एक हकीकत नहीं कुछ और भी है.
तुम अगर आँख चुराओ तो ये
हक है तुमको,
मैंने तुमसेही नहीं सबसे मुहब्बत की है.’
यावर आतून दुखावलेली शुभा म्हणते, ‘तुला जगाच्या व्यवहारात अजिबात वेळ नाही हे मान्य. सर्वांवरचे तुझे प्रेम फक्त माझ्यावरच नाही हेही मान्य. पण तुझ्या प्रेमात असणे, मी तुझी असणे हेच माझ्यासाठी खूप आहे. आपण एक होऊ शकणे माझ्या नशिबात नसेल, तर नसो. तू कितीही दु:ख दिलेस तरी चालेल तो हक्क मी तुला कधीच दिला आहे. पण माझी गोष्ट वेगळी आहे. मी निस्सीम प्रेम केले आहे!
‘तुमको दुनिया के गम-ओ-दर्दसे फुर्सत ना सही,
सबसे उल्फत सही मुझसेही
मुहब्बत ना सही,
मैं तुम्हारी हूँ यही मेरे लिए क्या कम है,
तुम मेरे होके रहो ये मेरी किस्मत
ना सही.
और भी दिलको जलाओ तो ये
हक है तुमको,
मेरी बात और है मैंने तो मुहब्बत की है.
तुम मुझे भूल भी जाओ तो ये
हक है तुमको’
हे अशी उदासी पसरवत येणारी, आतून खिन्न करतानाही दिलासा देणारी प्रांजळ अभिव्यक्ती आताच्या मनोरंजन विश्वात शक्य आहे? नाही ना? कारण तो काळ और होता आणि त्याची गोष्टच और होती!