दिसपूर : आसामच्या १२ जिल्ह्यांमध्ये पुराता तडाखा बसला आहे. याठिकाणचे सुमारे ३.३७ लाख नागरिक अजूनही पुराच्या विळख्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज, रविवारी दिली.
आसाम सरकारच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत पुर आणि भूस्खलनामुळे एकूण २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ६ जण भूस्खलनात मरण पावले आहेत. राज्यातील श्रीभूम सर्वाधिक पूरप्रभावित भाग असून, १.९३ लाखांहून अधिक लोक तिथे पुराच्या विळख्यात आहेत. इतर प्रभावित जिल्ह्यांमध्ये हैलाकांडी येथील ७३७२४ तर कछार येथील ५६३९८ नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यात एकूण 337358 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. तर ४१ सर्कल व ९९९ गावे प्रभावित झाली आहेत. राज्यातील ३६ हजारांहून अधिक नागरिकांनी १३३ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. तर ६८ मदत वितरण केंद्रांतून गरजूंना मदत पोहचवली जात आहे. राज्यात पुरामुळे 12659 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.
तर राज्याच्या 2 जिल्ह्यांमध्ये शहरी पूरामुळे 284 लोक प्रभावित आहेत. तसेच काझीरंगा नॅशनल पार्क व पोबितोरा वन्यजीव अभयारण्य अजूनही पाण्याखाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ब्रह्मपुत्रा नदीसह प्रमुख नद्यांचा पूर सध्या ओसरत असला तरी काही नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवर आहेत. धुब्री येथे ब्रह्मपुत्रा, धरमटुल येथे कोपिली, बीपी घाट येथे बराक, आणि श्रीभूमी येथे कुशियारा धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.