प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे
नाशिक : गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या सुमारे १,६३६ कोटींच्या मलनिस्सारण योजनेच्या प्रस्तावाची राज्य शासनाकडून शहानिशा सुरू झाला आहे. महापालिकेने या योजनेसंदर्भात ५० पानांचा अहवाल शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केल्यानंतर योजनेचा प्रस्ताव तपासणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने १,३७४ कोटींचा प्रस्ताव केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे पाठवला होता. यामध्ये नऊ मलनिस्सारण केंद्रांचे अद्ययावतीकरण आणि मखमलाबाद व कामटवाडे या दोन नवीन केंद्रांची उभारणी प्रस्तावित आहे. दरम्यान, शासनाकडून प्रतिसाद मिळण्याअगोदरच महापालिकेने या योजनेसाठी पीपीपी तत्त्वावर निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. त्यात विशिष्ट ठेकेदार पात्र ठरावा यासाठी अटी व शर्ती अंतर्भूत करण्यात आल्या. योजनेच्या कामात वाढ करून १,६३६ कोटींवर नेण्यात आली.
याविरोधात काही मक्तेदार कंपन्यांनी आक्षेप घेतल्यानंतर या निविदा प्रक्रियेतील अनागोंदी उघडकीस आली.त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी या योजनेविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करत योजनेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. तर शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनीही या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत, न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता.
त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तक्रारीची दखल घेऊन निविदा प्रक्रियेची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले होते. कार्यासन अधिकारी मो. क. बागवान यांनी यासंदर्भात आयुक्त मनीषा खत्री यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागाने ५० पानांचा अहवाल नगरविकास विभागाला सादर केला. या अहवालातील नकारात्मक शेरे योजना गुंडाळण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता असतानाच योजनेचा प्रस्ताव तपासणीसाठी शासनाने परस्पर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाठविल्याचे समजते.
मलनिस्सारण योजनेचा प्रस्ताव महापालिकेने शासनाला सादर केला आहे. शासनाकडून अद्याप महापालिकेला कुठल्याही सूचना व निर्देश प्राप्त झालेले नाहीत. शासन आदेशानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
-रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा व मलनिस्सारण