Sunday, June 8, 2025

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरुन त्याने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. पियुष चावला भारताच्या २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता.


‘’क्रिकेटच्या सर्वच प्रकरातून निवृत्त होत आहे. या प्रवासात माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद’’ अशा आशयाची भावनिक पोस्ट इन्स्टाग्राम या सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर लिहीली आहे, दोन दशकांहून अधिक काळ क्रिकेटच्या मैदानावर वेळ घालवल्यानंतर आता या खेळाला अलविदा करण्याची वेळ आली आहे.


भारताचं प्रतिनिधीत्व करण्यापासून ते २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचं सदस्य होणं, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी माझे प्रशिक्षक के.के गौतम आणि स्वर्गीय पंकज सारस्वत यांचा विशेष आभारी असल्याचंही त्याने पुढे म्हटलं आहे.


पियुष चावलाने तीन कसोटी, २५ एकदिवसीय सामने आणि ७ टी-२० सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ७, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३२ आणि टी-२० मध्ये ४ बळी घेतले आहेत. चावलाने भारताकडून डिसेंबर २०१२ मध्ये अखेरचा सामना खेळला होता. तसंच त्याने आयपीएल अर्थातच इंडियन प्रमियर लीगमध्ये पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधत्व केलं आहे. आयपीएलमध्ये विविध संघांकडून खेळताना त्याने १९२ सामन्यात १९२ बळी घेतले आहे. २०२४ मध्ये तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. मात्र, २०२५ मध्ये त्याच्यावर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नव्हती.

Comments
Add Comment