
इगतपुरी : शिवराज्याभिषेक हा फक्त सोहळा नसुन ती एक क्रांती आहे. एका मातेच्या संस्कारांनी घडवलेली, मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेली, तमाम रयतेच्या मनावर कोरलेली, स्वाभिमानाचं जगणं शिकवणारी, पाच पातशाह्यांच्या छाताडावर पाय ठेऊन उभी राहिलेली, स्वराज्याच्या आसमंतात लिहिलेली, जगातली पहिली क्रांती म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा आहे असे प्रतिपादन कळसुबाई गिर्यारोहक मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांनी केले.
कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी जिजाऊंच्या जन्मस्थळी जाऊन ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन साजरा केला त्या प्रसंगी भगीरथ मराडे बोलत होते. महाराष्ट्र ही शूरवीरांची भूमी, स्वाभिमान इथला बाणा, मातृभूमीच्या व रयतेच्या रक्षणासाठी इथे झुंजले छत्रपती शिवाजी महाराज. रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ही ऐतिहासिक दृष्टीने महत्वाची घटना आहे.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ रोजी म्हणजेच इ.स. ६ जून १६७४ रोजी छत्रपतींचा राज्याभिषेक झाला आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा झाली. महाराष्ट्रातील प्रत्येक गडकोटावर शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा होऊन सर्वच गडकिल्ल्यांचा इतिहास अबाधित राहून पुढील पिढ्यांच्याही स्मरणात रहावा या उद्देशाने गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक शिवकालीन विविध ऐतिहासिक स्थळी शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा करतात.
यावेळी स्वराज्यजननी राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडराजा येथे गिर्यारोहकांनी जाऊन जिजाऊंचा जन्म झालेल्या राजवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या व जिजाऊंच्या मूर्तीचा पंचामृताने अभिषेक करून छत्रपतींचा पेहराव परिधान केलेल्या नामदेव जोशी या युवकाची मिरवणूक काढून जिजाऊ, शिवरायांचा जयघोष करीत ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा दिन मोठ्या उत्साहाने दिमाखात साजरा केला.
या उत्साहात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, इगतपुरी शहराच्या माजी नगरध्यक्षा अलकाताई चौधरी, शाहीर बाळासाहेब भगत, डॉ.महेंद्र आडोळे, नामदेव जोशी, गोकुळ चव्हाण, किसन बिन्नर, संजय शर्मा, सुरेश चव्हाण, रामदास चौधरी, लक्ष्मण जोशी, प्रवीण भटाटे, शांता बिन्नर, सोनल शर्मा, पूजा मालुंजकर आदी महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.