Sunday, June 8, 2025

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी रवाना होण्यापूर्वी, टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी दोघांनीही अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.


जसप्रीत बुमराह किती सामने खेळेल ?


पाठीच्या दुखापतीतून जसप्रीत बुमराह सावरत आहे. तो इंग्लंड विरुद्ध पाच पैकी तीन कसोटी सामने खेळेल. पण हे सामने कोणते असतील हे योग्य वेळी जाहीर करू, असे भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले.


रोहित-विराटबद्दल शुभमन गिल काय म्हणाला ?


रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर. अश्विन यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या दिग्गजांच्या गैरहजेरीत भारत इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेट खेळणार आहे. यामुळे दिग्गजांची उणीव जाणवेल. पण सध्याचे संघाचे कॉम्बिनेशन समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यास सक्षम आहे. भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे, असे कर्णधार शुभमन गिल म्हणाला.



इंग्लंडमध्ये प्लेइंग इलेव्हन कसे असेल ?


भारताचा १८ खेळाडूंचा संघ आहे. प्रत्येक सामन्यासाठीच्या परिस्थितीनुसार अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर करू; असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांमध्ये समतोल साधू, असेही ते म्हणाले. करुण नायर हा गुणी गोलंदाज आहे. करुणचा सुयोग्य वापर करू; असे संकेत त्यांनी दिले.


कर्णधारपदाबद्दल गिल काय म्हणाला ?


प्रत्येक खेळाडू खेळत - खेळत शिकत असतो. संघ सहकाऱ्यांशी संवाद साधत नवी जबाबदारी समर्थपणे पार पाडेन, असा विश्वास शुभमन गिलने व्यक्त केला. भारताकडे गुणी गोलंदाज आणि उत्तम फलंदाजांचा ताफा आहे. बुमराह तर आहेच. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच भारतीय संघाची ताकद वाढली असल्याचे शुभमन गिलने सांगितले.


बंगळुरूतील चेंगराचेंगरीसाठी जबाबदार कोण ?


कोण जबाबदार हे ठरवण्यासाठी मी सक्षम व्यक्ती नाही. रोड शो करावा की करू नये याचे निर्णय मी घेत नाही आणि त्यावर माझा विश्वास नाही. खेळाडूंसाठी त्यांची कामगिरी महत्त्वाची आहे आणि राहणार. राहिला रोड शो चा विषय... तर गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण जाणार असल्यास असे कार्यक्रम टाळणे हिताचे असते. नागरिकांचे जीवन कधीही महत्त्वाचे आहे; असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले. ज्यांच्या घरातील माणसं या दुर्दैवी घटनेत गेली त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, असेही गौतम गंभीर म्हणाले. कौतुकाचे मोठे कार्यक्रम सुरक्षित पण चोख बंदोबस्त असलेल्या ठिकाणी व्हायला हवे. तिथे जे घडले ते खूप दुःखद आहे. खेळाडू, फ्रँचायझी आणि चाहते म्हणून आपण अधिक जबाबदार असले पाहिजे; असेही गौतम गंभीरने सांगितले.


इंग्लंड दौऱ्यासाठी १८ सदस्यीय भारतीय संघ


शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिमन्यू ईश्वरन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.



५ सामन्यांच्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या


भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका हेडिंग्ले येथील लीड्स क्रिकेट ग्राउंडवर सुरू होणार आहे, ज्यातील पहिला सामना २० ते २४ जून दरम्यान असेल. पुढचा कसोटी सामना २ ते ६ जुलै दरम्यान बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंडवर होईल. तिसरा कसोटी सामना १० जुलै ते १४ जुलै दरम्यान लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर होईल. त्यानंतर मँचेस्टर येथे २३ जुलै ते २७ जुलै दरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड येथे चौथा कसोटी सामना होईल. या रोमांचक मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ३१ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान लंडनमधील ओव्हल येथे खेळवला जाणार आहे.

Comments
Add Comment