
भरपाईसाठी पावले उचलण्याची शेकापची मागणी
अलिबाग : अवकाळी पावसामुळे शेतकरी, मच्छीमार, बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून, अनेकांच्या घरांची पडझड होऊन वित्तहानीही झाली आहे. सरकारने जिल्ह्यातील शेतकरी, मच्छिमार, बागायतदार तसेच नुकसानग्रस्तांच्या प्रश्नांकडे गांभिर्याने लक्ष देऊन त्यांना भरपाई द्यावी आणि तातडीने भरपाई देण्यासाठी पावले उचलावी, अशी मागणी शेकाप राज्य मिडीया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली.
रायगड जिल्हयात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे शेतकरी, बागायतदार व मच्छिमार यांचे खुप मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे भात पिकांसह आंबा, काजू व इतर पिकांची मोठी हानी झाली. वादळी वाऱ्यामुळे दोनशेहून अधिक घरांची पडझड झाली. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील धान्य भिजून नुकसान झाले. पूरसदृश्य परिस्थितीमुळे अनेक घरे उद्ध्वस्तही झाली. पावसाळा सुरु होण्यापूर्वी आठ दिवस अगोदर जिल्ह्यात पेरणीची कामे केली जातात; परंतु अवकाळी पावसामुळे शेतजमिनी पाण्याने भरली. अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे भात पेरणी करणे शेतकऱ्यांना कठीण होऊन बसले.
त्यामुळे शेतकऱ्यांना रो-पेरणी करावी लागणार आहे. त्याचा ५० टक्केपेक्षा अधिक उत्पन्नावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. खारेपाटातील शेतकऱ्यांनाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावीत अशीही मागणी करण्यात आली. पावसामुळे मासेमारीवर बंदी घालण्यात आल्याने मच्छीमारांवर मासेमारीचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. सुक्या मासळीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे मच्छीमारांचीही खुप मोठी हानी झाली आहे.
शेतकरी, मच्छीमारांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. सरकारने जिल्हयातील शेतकरी, मच्छिमार, बागायतदार, तसेच नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणीही यावेळी शेकाप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत करीत तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी पावले उचलण्यात यावी असे शेकापच्यावतीने यावोळी मागणी करण्यात आली.
शेकाप नेते अनिल पाटील यांनी अवकाळी पावसाने शेतकरी, मच्छीमार, फळबागायतदार यांचे नुकसान झाले असून, याकडे स्थानिक आमदारांसह खासदारांचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले. नरेश म्हात्रे यांनी अलिबाग तालुक्यातील श्रीगाव हद्दीतील दुबार शेतीचे पिक अवकाळी पावसाने वाया गेल्याने त्याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याचे सांगितले. अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी अवकाळी पावसाने मच्छीमारांचे कसे नुकसान झाले याचा पाढाच पत्रकारांपुढे वाचला आणि ओला दुष्काळ शासनाने जाहीर करण्याची मागणी केली.
शेकापच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा वकील मानसी म्हात्रे यांनी रायगडला पालकमंत्री नसल्याने खंत व्यक्त करीत जिल्ह्याला दोन कॅबिनेट दर्जाचे दोन मंत्री असतानाही शेतकरी, मच्छिमार, फळबागायतदार यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. दुसरीकडे अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गासह अलिबाग तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दाणादाण उडाल्याकडे पत्रकारांचे लक्ष वेधले. वीज ग्राहकांवर प्रीपेड मीटरची सक्ती केली जात होती. त्यासाठीही शेकापने आवाज उठविताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात लक्ष घालीत सक्ती होणार नसल्याचे सांगत वीजग्राहकांना दिलासा दिल्याचेही म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.