बंगळुरूत चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ज्या ११ जणांच्या मृत्यू झाला त्यातील सर्वात लहान वयाची मुलगी १३ वर्षांची होती तर सर्वात मोठ्या वयाची व्यक्ती ही ३३ वर्षांची होती. मृतांमध्ये तीन किशोरवयीन आणि २० ते ३० वयोगटातील सहा जणांचा समावेश आहे. बहुतेक जण त्यांच्या ओळखीतल्यांसोबत क्रिकेटपटूंना बघण्यासाठी आले होते. अनेकजण बंगळुरूतले होते तर काही जण आसपासच्या भागांमधून आले होते.
कर्नाटक सरकारच्यावतीने क्रिकेटपटूंचा आधी बंगळुरू येथील विधानसौदच्या अर्थात विधान भवनाच्या आवारात सत्कार करण्यात आला. यानंतर खेळाडू बसमधून स्टेडियमच्या दिशेने रवाना झाले. पाठोपाठ सत्ताधारी स्टेडियमच्या दिशेने रवाना झाले. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने सेलिब्रेटी आणि व्हीआयपी स्टेडियमच्या दिशेने रवाना झाले. यामुळे पोलिसांपुढे पेच निर्माण झाला. वाहनांच्या ताफ्यापासून गर्दीला दूर ठेवणे कठीण झाले होते. नागरिक खेळाडूंची झलक पाहण्यासाठी रेटारेटी करुन रस्त्यावर मोक्याची जागा पटकावण्याचा प्रयत्न करू लागले. गर्दीला आवरणे कठीण झाल्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला सौम्य लाठीमार केला. या लाठीमाराने परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे बघून पोलिसांनी लाठीमाराची तीव्रता वाढवली. यामुळे धावपळ झाली आणि चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. एएस दिव्यांशी (१३), दोरेशा (३२), भूमिका (२०), सहाना (२५), अक्षता (२७), मनोज (३३), श्रवण (२०), देवी (२९), शिवलिंग (१७), चिन्मयी (१९) आणि प्रज्वल (२०) या ११ जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. घाईघाईने केलेली तयारी, पुरेशा नियोजनाचा अभाव आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी ही या दुर्घटनेची प्रमुख कारणे ठरली.
राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी संघाचा सत्कार करण्यासाठी विधानसभेत स्वागत समारंभ आयोजित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विधानसभेच्या संकुलात व्हीआयपी उपस्थितीमुळे विधानसभेच्या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करावे लागले. यामुळे चिन्नास्वामी स्टेडियममधील लाखो चाहत्यांना हाताळण्यासाठी मर्यादित संख्येने पोलिस तैनात करावे लागले. स्टेडियमची क्षमता सुमारे ३५,००० आहे आणि गर्दी ३ लाखांपेक्षा जास्त होती.
बंगळुरू पोलिसांनी सुरक्षेच्या मुद्यांना पुढे करुन विजयी मिरवणुकीला परवानगी नाकारली होती. पण आयत्यावेळी पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्यात आला आणि विजयी मिवणुकीचे नियोजन सुरू झाले. हे नियोजन अयशस्वी झाले आणि चेंगराचेंगरी झाली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातलगांना दहा लाख रुपयांची भरपाई आणि जखमींवरील उपचारांचा खर्च सरकार करेल या घोषणा केल्या. चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी करू असेही मुख्यमंत्री म्हणाले. या संदर्भात सविस्तर बोलणे मुख्यमंत्र्यांनी टाळले. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आणि केंद्र सरकारचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटक सरकारला जाब विचारला आहे. प्रयागराज येथील अमृत कुंभावेळी अभूतपूर्व अशी गर्दी होती. या गर्दीचे नियोजन उत्तर प्रदेश सरकारने केंद्र सरकारच्या सहकार्याने केले. पण कर्नाटक सरकारला विजयी मिरवणुकीचे नियोजन करणे जमले नाही; अशी टीका प्रल्हाद जोशींनी केली. त्यांनी चेंगराचेंगरीसाठी सरकारला जबाबदार ठरवले.