पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश
पालघर :राज्यामध्ये कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत असून पालघर जिल्ह्यामध्ये देखील काही रुग्ण आढळले आहेत या आपत्तीशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्ज रहावे असे निर्देश वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा तसेच संभाव्य आपत्तीचा आढावा पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकताच घेतला.
यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, जव्हार आणि डहाणूचे प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासुर, विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी विजय जाधव, तेजस चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कोविडचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण करून घ्यावे, उपाहारगृहामध्ये स्वच्छता ठेवून निर्जंतुकीकरण करावे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करावे अशा सूचना पालकमंत्री गणेश नाईक यांनी केल्या. बोगस बी- बियाणे विक्री करणाऱ्या दुकानावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांना शासना मार्फत देण्यात येणाऱ्या बी- बियाणे व खते कमी पडणार नाहीत. तसेच पिक विमा मिळणे हा प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क असून यामध्ये कोणी गैरप्रकार करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.